महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रीय यंत्रणांचा दडपशाहीसाठी वापर, मात्र आम्ही चिंता करत नाही- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यलयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई तसेच विविध राजकीय मुद्द्यावर मते मांडली.

By

Published : Jun 25, 2021, 7:45 PM IST

Updated : Jun 25, 2021, 8:17 PM IST

sharad pawar
sharad pawar

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यलयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई तसेच विविध राजकीय मुद्द्यावर मते मांडली.

यंत्रणांचा दडपशाहीसाठी वापर होतोय, मात्र आम्ही चिंता करत नाही- शरद पवार

कारवाईची चिंता नाही -
हे आम्हाला काही नवीन नाही, अनिल देशमुख काही पहिले नाहीत यापूर्वी अशा अनेकांना सक्तीचा या पद्धतीने वापर करण्याचा नवीन पायंडा राज्यकर्त्यांनी पाडलेला आहे. त्याची चिंता वाटत नाही, अनिल देशमुख यांच्या कुटूंबावर देखील यापूर्वी यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला, त्यांच्या चिरंजीवच्या व्यवसायावर प्रेमाची नजर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी दाखवलेली होती. त्यावेळी काहीही हाती आलेले नव्हते आणि त्या नैराश्यातून आणखी कुठे त्रास देता येईल का, असे प्रयत्न सुरू आहेत त्यातलाच हा प्रकार असल्याचे शरद पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना टोला -
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर कारवाईबाबत पक्षात केलेल्या ठरावावर बोलताना पवारांनी जोरदार टीका केली. सार्वजनिक जीवनात अनेक राजकीय पक्षांची दुरून पाहणी करत असतो मात्र एखाद्या राजकीय नेत्याबाबत राजकीय पक्षाच्या नेत्याने असे ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते, अशी टीका करत चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. यापूर्वी पाहिल्या नाहीत अशा अनेक गोष्टी मांडण्याबाबत त्यांचा लौकिक आहे, त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन असा काही ठराव मांडला असेल तर, आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.

यंत्रणांचा गैरवापर -
जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे. हे आता नवीन नाही महाराष्ट्र आणि इतर राज्यात सुरू केले आहे. केंद्रात हे सरकार आल्यापासून असे हे पाहायला मिळत आहे, मला काही चिंता वाटत नाही. लोकही त्याला गांभीर्याने घेत नाही, या सगळ्या चौकशा करणाऱ्या यंत्रणेची सत्ता त्यांच्या हातात आहे, त्याचे स्वागत आमचे सर्व सहकारी करतील असे देखील पवार म्हणाले.

दडपशाहीची चिंता नाही -
जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही, तो विचार दडपण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जातो आणि हे काही नवीन राहिलेले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यात हे होत आहे, केंद्रात यांच्या हातात सत्ता आल्यानंतर आपण या गोष्टी पाहत आहोत. यापूर्वी मात्र असे कधी पाहिलेले नाही असे सांगत, मला याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही आणि लोकही फार गांभीर्याने घेत नाही, असे पवार म्हणाले.

काँग्रेसच्या स्वबळावर, भाष्य -
प्रत्येक राजकीय पक्षाला आपले संघटन वाढवायचा अधिकार आहे, त्यासंबंधी आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी असे प्रयत्न होत असतात, काँग्रेस असे प्रयत्न करत असेल तर त्यात वावगे वाटत नसल्याचे पवार म्हणाले.

काश्मीरबाबत -
पंतप्रधानांनी काश्मीरला स्वातंत्र्य दर्जा यापूर्वी होता तो तुम्ही काढून घेतला, त्याचे परिणाम वाईट होतील असे आम्ही सांगत होतो. मात्र कोणाचे न ऐकता त्यांनी हा निर्णय घेतला, आता वर्ष दीड वर्षाने का होईना हा निर्णय योग्य नाही. या निष्कर्षापर्यंत राज्यकर्ते आले आणि तो निर्णय बदलण्याची तयारी त्यांनी दाखवली आम्ही त्याचे स्वागत करतो असेही पवार म्हणाले.

काँग्रेसशिवाय आघाडी नाही -
आघाडी म्हणून आम्ही आता बसलेलो नाही पण जर काही पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर काँग्रेसला घेऊनच करावी लागेल. त्याची आवश्यकता आहे हे माझे मत आहे आणि त्या बैठकीतही मी हे मांडले असे पवार म्हणाले.

सामूहिक नेतृत्व -
तसेच आघाडीच्या नेतृत्वाबाबत बोलताना, याबाबत अजून काही ठरलेले नाही. मात्र, सामुदायिक नेतृत्व हे सूत्र पुढे ठेवून आम्हाला पुढे जावे लागेल, असे आपल्याला वाटत असल्याचे पवार म्हणाले.

आरक्षण -
मराठा आरक्षणावर बोलताना या मुद्दयावर केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे असे पवार म्हणाले. ओबीसीबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला, मात्र सरकारची भूमिका याबाबत कायम असल्याने पुन्हा न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

फार उद्योग केले-
भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व शरद पवारांनी करावे असा सूर आहे असे विचारले असता, आता शरद पवारांनी फार वर्ष असे उद्योग केले अशी मिश्किल टिप्पणी करत आता फक्त त्यांना शक्ती देणे एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, मदत करणे आणि मार्गदर्शन करणे हे काम असल्याचे पवार म्हणाले. देशात आज लोकांना एकत्र येऊन काही पर्याय असावा, अशी जनतेची अपेक्षा आहे आणि ही लोक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते आणि ती आम्हाला निश्चित करावी लागेल असे पवार म्हणाले.

हेही वाचा -राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू... डेल्टा प्लस व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अधिक धोका

Last Updated : Jun 25, 2021, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details