पुणे -दरवर्षी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात दिवाळीनिमित्त चायनीज वस्तू खरेदी केल्या जातात. पण या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्याने देशात चीन व चिनी वस्तूंबद्दल चीड निर्माण झाल्याचे दिसत आहे. यंदा दिवाळीत पुणेकरांनी स्वदेशीचा नारा देत 70 टक्क्यांहून अधिक स्वदेशी मालाची खरेदी केली आहे.
पुणे शहरात तुळशीबाग हे खूप मोठे खूप प्रसिद्ध मार्केट आहे. तसेच, मंडईतील लाईट मार्केट हेही खूप मोठे मार्केट असून या दोन्ही मार्केटमध्ये 1500 हून अधिक दुकाने आहे. येथे मोठ्या प्रमाणात चायनीज वस्तूंची विक्री होत होती. महिलांना लागणारे दाग दागिने, कपडे, खेळणी, लाईटिंगच्या वस्तू, अशा विविध चायनीज वस्तूंची या ठिकाणी विक्री होत होती. पण यंदा दिवाळीत व्यापाऱ्यांबरोबर पुणेकरांनीही स्वदेशीचा नारा देत दिवाळी साहित्याची खरेदी केली आहे.
यंदा दिवाळीत पुणेकरांनी दिला स्वदेशीचा नारा... चायनीज वस्तूंखरेदीकडे फिरवली पाठ हेही वाचा -फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या माय-लेकाला शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण
दरवर्षी 50 टक्के होणारी चिनी वस्तूंची विक्री यंदा 10 टक्क्यांवर
पुण्यातील तुळशीबाग येथे 600 हून अधिक विविध साहित्य विक्रीची दुकाने असून दरवर्षी 50 टक्क्यांहून अधिक चिनी वस्तूंची विक्री होते. मात्र, जून महिन्यापासूनच चिनी वस्तूंविरुद्ध लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. यामुळे यंदा दिवाळीत चिनी वस्तू विक्री न करण्याचे ठरवले होते, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. 'आहे तो माल विकायचा आणि नवीन चिनी वस्तू घ्यायच्या नाहीत, हे ठरवले होते. त्यानुसारच यंदा दिवाळीत फक्त 10 टक्के चिनी माल विकला गेला आहे,' अशी माहिती तुळशीबाग येथील विक्रेत्यांनी दिली.
नागरिकांचाही यंदा स्वदेशीचा नारा
गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात 20 जवान हुतात्मा झाल्याने देशात चीन व चिनी वस्तूंबद्दल जी चीड निर्माण झाली होती, ती तशीच असून यंदा दिवाळीत नागरिकांनी स्वस्त असणाऱ्या चिनी वस्तूंकडे पाठ फिरवली आणि स्वदेशी वस्तूंची जास्त खरेदी केली आहे. त्यामुळेच पुणे शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिनी वस्तूंची खरेदी 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. फक्त तुळशीबागेचा विचार केला तर तुळशीबागेत दरवर्षी 50 टक्के चिनी वस्तू खरेदी व्हायची. ती यंदा 10 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
यंदा 20 ते 25 टक्केच लोकांनी केली चिनी वस्तू-खरेदी
दिवाळीसाठीच्या वस्तूंमध्ये दिवे, वीजमाळा, रंगबेरंगी विजेचे दिवे, सजावटीच्या मेणबत्या, पूजा साहित्य, अशा अनेक वस्तू नागरिक दरवर्षी खरेदी करतात. दरवर्षी हे साहित्य खरेदी करताना स्वस्त असणाऱ्या चिनी वस्तूंना पुणेकर जास्त पसंती देत होते. पण यंदा मात्र फक्त 20 ते 25 टक्केच लोकांनी चिनी वस्तू बाजारातून खरेदी केल्या आहेत.
लवकरच तुळशीबाग चिनी-वस्तू-मुक्त होणार
गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर चिनी वस्तूंबाबत लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. आम्हीही तुळशीबागेतील सर्व व्यापाऱ्यांनी चिनी वस्तू न विकण्याचा निर्धार केला असून लवकरच तुळशीबाग ही चिनी वस्तू मुक्त होणार आहे, असेही यावेळी व्यापाऱ्यांनी म्हटले.
हेही वाचा -अनलॉकनंतर शिर्डी साई मंदिर परिस्थिती.. तीन दिवसात २४ हजार भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन