महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'दुष्काळग्रस्त परिस्थितीत 'हा' प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे'

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अडचणीत सापडल्या आहेत.

By

Published : May 4, 2019, 1:31 PM IST

छगन भुजबळ यांचा दुष्काळ दौरा

नाशिक - दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीसा येत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

येवला तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस देण्यात येत आहे. त्यात पुढील दीड दोन महिन्यात खरीप हंगाम सुरू होईल. तेव्हा बुडालेल्या नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे उपलब्ध होईल, असा प्रश्न आहे. याबाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत असले तरी गेल्या ६ महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्याच व्यवहार नसल्याने कर्ज मिळणार नाही, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याकडे पैसे येणार तरी कसे आणि शेतकरी कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अडचणीत सापडल्या आहेत. कुकुटुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर ७० हजारहून अधिक पक्षांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील ३५ हजार पक्षांचा पाण्याअभावी मृत्यू झाला आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे जनावरांच्या चारा नियोजनाबाबत पाठपुरावा सुरू होता. मात्र, शासनाने चाऱ्याचे योग्य नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार २०१९ मध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी येवला तालुक्यातील गाव तळवाडी, महादेव नगर, ममदापूर, राजापूर, नगरसुल इत्यादी दुष्काळी गावांना भेटी देऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत येवला मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येथे चर्चा केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर महेंद्र मोहन शेलार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details