महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 13, 2019, 5:09 PM IST

Updated : Apr 13, 2019, 7:33 PM IST

ETV Bharat / city

रताळाला म्हणतंय केळं अन् दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळं, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अशोक चव्हाण राज ठाकरेंवर बेंडकासारखा ओरडतोय म्हणून टीका करायचे पण काँग्रेसच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळेच त्यांना राज ठाकरेसारखा नेता किरायाने आणावा लागत आहे. इतके दिवस खुर्च्या, स्टेज आणि मंडप किरायाने मिळत होत्या. पण आता मात्र नेताही प्रचाराला किरायाने मिळू लागल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड- इतके दिवस खुर्च्या, स्टेज आणि मंडप किरायाने मिळत होत्या. पण आता मात्र नेताही प्रचाराला किरायाने मिळू लागला आहे. हेच अशोक चव्हाण राज ठाकरेंवर बेंडकासारखा ओरडतोय म्हणून टीका करायचे पण काँग्रेसच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळेच त्यांना राज ठाकरेसारखा नेता किरायाने आणावा लागत आहे. बघा..बघा रताळाला म्हणतंय केळं..अन् दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळं.. असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केला. नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते.


राज ठाकरे यांनी नांदेड येथील उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तरे दिली. मला जनतेने आणि मोदींनी मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला जनतेने मात्र घरी बसवले आहे. मनसे ही पूर्वी मतदार नसलेली सेना होती. आता ती उनसे झाली असून उमेदवार नसलेली सेना असा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या पक्षाला काहीच करायचे नाही. फक्त टीका करायची एवढाच त्यांचा उद्योग सुरू असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अशोक चव्हाण यांना आता जनाधार मिळत नसल्यामुळे राज ठाकरेसारखे नेते किरायाने आणावे लागत आहेत. ही शोकांतिका आहे अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जवानांच्या कर्तव्यावर शंका घेणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.


मराठवाड्याला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न असून नदीजोड प्रकल्प त्यातीलच एक भाग आहे. मराठवाड्याला गोदावरीचे हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले. पण २०१० साली अशोकरावांनी या उलट करारावर सह्या केल्या होत्या याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी करुन दिली.


भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी राजा खंडेराव देशमुख, दिलीप सोनटक्के यांनी भाजपत प्रवेश केला. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, आमदार निलय नाईक आदीसह महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Apr 13, 2019, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details