नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आमचा तपास सुरु आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही तपास करत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. अन्वय नाईक यांची केस चुकीच्या पद्धतीनं मागच्या सरकारने दडपल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही
दरम्यान, कंगना-राऊत प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे. अर्णब प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कंगनाच्या घरावर आणि ऑफिसवर कारवाई बीएमसीने केली होती. त्यांच्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री आणि मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.
कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारने चांगलं काम केलं, हिच आमची अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावे, असा टोला लगावला आहे.