महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 7, 2019, 5:24 PM IST

ETV Bharat / city

मुंबईत मागील 9 वर्षात शून्य एन्काऊंटर; 'या' गँगच्या गुंडाचा केला होता शेवटचा खात्मा

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार २००२ ते २००८ या दरम्यान देशात ४४० संशयास्पद 'एन्काऊंटर' करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये २३१, राजस्थानमध्ये ३३, महाराष्ट्रात ३१, दिल्लीत २६, आंध्रप्रदेशात २२ तर उत्तराखंड येथे १९ एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या.

Zero encounter in Mumbai in last 9 years
मुंबईत मागील 9 वर्षात 'झिरो' एन्काऊंटर

मुंबई- हैदराबाद येथील पशुवैद्यकीय तरुणीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींना हैदराबाद पोलिसांनी पळून जात असताना एन्काऊंटरमध्ये ठार केले. या घटनेनंतर देशभर हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत असले तरी, पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित केले जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ९० च्या दशकात गँगवॉर हा चांगलाच फोफावला होता.

मुंबईत मागील 9 वर्षात 'झिरो' एन्काऊंटर

हेही वाचा -झारखंड विधानसभा निवडणूक: मतदानादरम्यान गोळीबार; 1 ठार, 2 जण गंभीर

उद्योगपती, बिल्डर यांना सतत खंडणीसाठी येणारे फोन, यावरून सुरू झालेले टोळीयुद्ध, यावर मुंबई पोलिसांच्या काही निवडक पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत अनेक गुंडांना यमसदनी पाठवले होते. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कारवाईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावर मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याची टीका होऊ लागली.

हेही वाचा -रायपूर: वाहतूक नियंत्रणाचा अनोखा फंडा!

मुंबई पोलीस खात्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या प्रदिप शर्मा, प्रफुल्ल भोसले, दया नायक, सचिन वझे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांवर सडकून टीका होत, त्यांच्यावर अटकेची कारवाई सुद्धा झाली होती. प्रदीप शर्मा या अधिकाऱ्याला लखन भैय्या बनावट चकमक प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर, सचिन वझे या अधिकाऱ्याला ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर सन २००० पासून मुंबई पोलिसांच्या एन्काऊंटर करण्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार २००२ ते २००८ या दरम्यान देशात ४४० संशयास्पद 'एन्काऊंटर' करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये २३१, राजस्थानमध्ये ३३, महाराष्ट्रात ३१, दिल्लीत २६, आंध्रप्रदेशात २२ तर उत्तराखंड येथे १९ एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या.

मुंबईत २०१० नंतर एकही एन्काऊंटर घडला नसून शेवटचा मुंबईतील एन्काऊंटर हा मुंबई पोलिसांनी २०१० मध्ये ओपेरा हाऊस या ठिकाणी अशोक परिहार या पांडव पुत्र गँगच्या गुंडाचा केला होता. अशोक परिहार या गुंडावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण व खंडणीसारखे तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल होते. तत्कालीन गुन्हे शाखा सहआयुक्त हिमांशु रॉय यांच्या पथकातील काहींनी ओपेरा हाऊस येथे पहाटे ३ च्या दरम्यान अशोक परिहार याला चकमकीत ठार मारले होते.

मुंबईत हरियाणा पोलिसांनी केला होता बनावट एन्काऊंटर -

हरयाणा येथील गँगस्टर संदीप गाडोली याला ताब्यात घेण्यासाठी हरियाणा येथील गुन्हे शाखेचे काही अधिकारी फेब्रुवारी 2016 मध्ये मुंबईतील अंधेरी परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये आले होते. यावेळेस संदीप गाडोली याने हरियाणा पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याचा बनाव रचून हरियाणा पोलिसांनी संदीप गाडोली याची बनावट चकमकीत हत्या केली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत हरियाणातील गँगस्टर रवींद्र गुज्जर यास अटक केली होती. हा आरोपी हरियाणा राज्यातील गुरुग्राम आणि जवळपासच्या परिसरातील स्थानिक गँगस्टर आहे. त्याची आपल्या क्षेत्रात मोठी दहशत असून मृत संदिप गाडोली याच्यासोबत असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हरियाणा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मिळून रवींद्र गुज्जर याने बनावट चकमक घडवून हत्या केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details