महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागरिकांच्या आरोग्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - यशवंत जाधव

मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांना कोरोनादरम्यान सुविधा देण्यासाठी पालिका सज्ज आहे. कोरोनाचे संकट दूर करणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा कशा दिल्या जातील याकडे लक्ष दिले जात आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील यासाठी पालिका आणि सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

By

Published : Apr 5, 2021, 7:59 PM IST

यशवंत जाधव यांची स्थाई समितिच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड
यशवंत जाधव यांची स्थाई समितिच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड

मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांना कोरोनादरम्यान सुविधा देण्यासाठी पालिका सज्ज आहे. कोरोनाचे संकट दूर करणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा कशा दिल्या जातील याकडे लक्ष दिले जात आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील यासाठी पालिका आणि सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

सोयी सुविधा देण्यावर भर

मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुका दरवर्षी होतात. आज पालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समितीची निवडणूक झाली. स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची चौथ्यांदा तर शिक्षण समिती अध्यक्षपदी संध्या दोशी सक्रे यांची दुसऱ्यांदा निवड झाली. त्यानंतर यशवंत जाधव बोलत होते. यावेळी बोलताना नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी लक्ष दिले जात आहे. खड्डे, रस्ते, पाणी, गटारे, एसटीपी प्रकल्प आदी कामे मार्गी लावण्यात येतील. नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा देताना आरोग्य विभागाला लागणार निधी कमी पडू देणार नाही. अतिरिक्त निधी लागला तरी तोही उपलब्ध करून दिला जाईल. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. कोरोनावर नियंत्रण मिळवताना प्रकल्प रखडणार नाहीत याकडे लक्ष दिले जाईल. मुंबईकरांना शिवसेनेने जी वचने दिली त्यापैकी अनेक वचने आम्ही पूर्ण केली आहेत. बाकी वचने आम्ही पूर्ण करू असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. काही प्रकल्प अर्धवट आहेत त्यापैकी कोणते प्रकल्प लवकर मार्गी लावायचे हे प्रशासनाबरोबर बसून निर्णय घेतला जाईल. 2022 मध्ये निवडणुकीत मुंबईकर आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवतील असा विश्वास जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य सरकार आणि पालिका जे काही नियम सांगत आहे त्याची अंमलबजावणी नागरिकांनी करावी आणि आपली काळजी घ्यावी असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.

यशवंत जाधव यांची चौथ्यांदा निवड

स्थायी समितीत एकूण 27 सदस्य आहेत. मतदान प्रक्रियेत 22 सदस्यांनी सहभाग घेतला. काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर काँग्रेसचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजपाचे भालचंद्र शिरसाट हे नामनिर्देशित सदस्य असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. शिवसेनेचे यशवंत जाधव यांना राष्ट्रवादी आणि समाजवादीचे एक- एक अशी एकूण 14 मते मिळाली. तर भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांना 8 मते मिळाली. यशवंत जाधव यांना अधिक मते मिळाल्याने पीठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यशवंत जाधव यांना विजयी घोषित केले. स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची चौथ्यांदा निवड झाली आहे.

संध्या दोशी यांची दुसऱ्यांदा निवड

शिक्षण समिती एकूण 26 सदस्य असून त्यापैकी 22 सदस्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला. काँग्रेसच्या आशा कोपरकर यांनी अर्ज मागे घेतला. निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे चारही सदस्य तटस्थ राहिले. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी सक्रे यांना 13 तर भाजपच्या पंकज यादव यांना 9 मते मिळाली. यामुळे शिवसेनेच्या संध्या दोशी यांना पीठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विजयी घोषित केले.

हेही वाचा -मुलुंडमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल चालकावर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details