मुंबई -मुंबई महानगरपालिका म्हणजे, 'सोन्याची अंडे देणारी कोंबडी', असे म्हटले जाते. या मुंबई महानगरपालिकेची २०२२ ( BMC elections 2022 news) ची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेने कंबर कसली असून मुंबईत ( BMC elections and north Indian vote ) झालेल्या उत्तर भारतीय हिंदी भाषी संकल्प सभेमध्ये या निवडणुकीचा श्री गणेशा करत माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुंकले आहे. मुंबईत असलेल्या उत्तर भारतीयांची संख्या ( BMC elections North Indian people vote) पाहता उत्तर भारतीयांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे का? ही मते कोणाच्या बाजूने असणार? काय असू शकतात समीकरणे? राजकीय पक्ष कशा पद्धतीने करत आहेत तयारी? याबाबत ( BMC elections North Indian people vote ) आज जाणून घेऊया.
कृपाशंकर सिंह व राजहंस सिंह या उत्तर भारतीय नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी? - दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. तर मतदारांची संख्या ही १५ लाखाच्या आसपास आहे. उत्तर भारतीयांची ही संख्या निवडणुकीच्यावेळी निर्णायक भूमिका बजावत असते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रत्येक क्षेत्रात उत्तर भारतीय कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या वॉर्ड रचनेनुसार असलेल्या २२७ मतदार संघापैकी जवळपास ५० वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचेच वर्चस्व आहे. विशेष करून दिंडोशी या विधानसभा मतदार संघात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच भाजप नेते राजहंस सिंह यांना भाजपने मुंबईमहानगरपालिकेवरून विधान परिषदेमध्ये आमदारकी दिली आहे. महापालिका सभागृहात त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले. मुंबईतील प्रश्नांचा त्यांना चांगला अभ्यास असून मुंबईतील उत्तर भारतीय मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. हिंदीबरोबर मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड असल्याने या प्रभावाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुरेपूर वापर करून घेणार असून त्या पद्धतीची रणनिती सुद्धा आखली गेली आहे.
भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबाची मूळ ही उत्तर प्रदेशातच आहेत. मुंबई आणि उपनगरातील उत्तर भारतीयांमध्ये कृपाशंकर सिंह यांचा दांडगा जनसंपर्क आहे . त्याचा फायदा सुद्धा भाजपला होणार आहे. मी एक पक्षाचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. त्यामुळे, पक्ष जे काम माझ्यावर सोपवेल ते मी पूर्ण करणार, असा निर्धारही कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुंबईतील बराच उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसला मानणारा आहे. या मतदारांना आकर्षित करणारा चेहरा भाजपकडे नव्हता. म्हणून माजी मंत्री कृपाशंकर सिंह व राजनाथ सिंह हे दोन काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजपमध्ये आल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याचा फायदा भाजपला होणार आहे.
शिवसेनेला उत्तर भारतीयांची मते भाजपमुळेच मिळायची? - यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितले की, उत्तर भारतीय लोकांचा भाजपकडे कल वाढत आहे. उत्तर भारतीय समाज हा नेहमी भाजपसोबत राहिलेला आहे. शिवसेनेला सुद्धा मत भाजपमुळेच भेटत होती. त्यात परवाची देवेंद्र फडवणीस यांची उत्तर भारतीय हिंदी भाषी महासंकल्प सभा बघून शिवसेना भयभीत झाली आहे. त्यांना कळून चुकले आहे उत्तर भारतीय मतदार सध्या कोणा सोबत असणार आहे. यंदा मुंबई महापालिका हातातून निसटणार हे आता स्पष्ट झाले आहे. व त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. उत्तर भारतीय हे नेहमी देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना त्या पाच वर्षांच्या काळात उत्तर भारतीयांना मुंबईत पूर्णत: सुरक्षित वाटले होते. परंतु, करोनामध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना पायी गावी जावे लागले, त्यात त्यांचे खूप हाल झाले. परंतु, देवेंद्र फडवणीस यांच्या एका आव्हानाने भाजपने रस्त्यावर उतरून सेवा प्रकल्प चालू केला. त्याचा नक्कीच फायदा या निवडणुकीमध्ये होईल.