महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मग 'रथयात्रा' पुढे न्या - उद्धव ठाकरे

आम्ही स्वतः सध्या महाराष्ट्रात फिरत आहोत. रथयात्रा वगैरे नसली तरी शेतकऱ्यांचे पिचलेपण समजून घेण्यासाठी आम्ही फिरत आहोत. सरकार घोषणा करते, योजना जाहीर करते, प्रत्यक्षात त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचतो?

By

Published : Jun 25, 2019, 8:24 AM IST

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई- राज्याच्या विकासाची गंगा ज्या दिशेने वाहत आहे, त्याच मार्गाने तुमची रथयात्रा पुढे जाणार. काही ठिकाणी दलदल, काही ठिकाणी भेगाळलेली जमीन, काही ठिकाणी शेतकऱ्यांचे सुकलेले चेहरे दिसतील. हे सगळे ठीक करून पुढे जा, असा सल्ला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून भाजपला लगावला. भारतीय जनता पक्ष राज्यात एका रथयात्रेचे आयोजन करीत आहे. त्या रथावर मुख्यमंत्री फडणवीस स्वार होणार आहेत, अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भाजपचे कान टोचले आहे.

आडवाणींच्या रथयात्रेची आठवण -
लालकृष्ण आडवाणी यांच्या अयोध्या रथयात्रेस २५ वर्षे उलटून गेली, पण राम वनवासातच आहे. आमचे अयोध्येत जाणे येणे सुरू आहे व राममंदिर होईल ही आशा जिवंत आहे. कारण जेथे तुम्ही कमी पडाल तेथे आम्ही खांद्याला खांदा भिडवून उभे राहू! तेव्हा रथ पुढे जाऊ द्या, अशा शुभेच्छाही ठाकरेंनी दिल्या.

गेल्या साडेचार वर्षांत सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा हेतू या रथयात्रेमध्ये आहे. मात्र, निवडणुका आल्या की अशा यात्रा निघत असतात, मुख्यमंत्री रथावर स्वार होऊन यात्रा करणार आहेत की पायी महाराष्ट्र पालथा घालणार? याबाबत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. तसे पाहिले तर गेल्या साडेचार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता एका विशिष्ट ध्येयाने भाजपच्या माध्यमातून यात्रा सुरू होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

राज्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. काही भागांत पाऊस सुरू झाल्याच्या बातम्या वरवरच्या आहेत. मंत्रालयात दूषित पाणी पिऊन शंभरेक कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलटय़ा झाल्या. पण अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रीय जनता टँकरच्या किंवा गढूळ पाण्यावरच कशीबशी तग धरून आहे. दोन दिवसांपूर्वीच सरकारने विधानसभेतच आकडेवारी देऊन महाराष्ट्रातील भयंकर चित्र समोर आणले. चार वर्षांत राज्यात बारा हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. या बारा हजार उद्ध्वस्त कुटुंबांच्या घरावरून रथयात्रेचा मार्ग वळावा व त्यांची वेदना समजून घेण्याचा सल्ला ठाकरेंनी लेखातून दिला आहे.

आम्ही स्वतः महाराष्ट्रात फिरतोय -
आम्ही स्वतः सध्या महाराष्ट्रात फिरत आहोत. रथयात्रा वगैरे नसली तरी शेतकऱ्यांचे पिचलेपण समजून घेण्यासाठी आम्ही फिरत आहोत. सरकार घोषणा करते, योजना जाहीर करते, प्रत्यक्षात त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचतो? शेतकऱ्यांची फसवणूक सरकारच्या नजरेत आणण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे सांगत ठाकरेंनी एकप्रकारे रथयात्रेवर निशाणा साधला.

राज्यात काँग्रेसचे राज्य असते तर सरकारने डोळय़ावरची झापडे काढावीत असे त्यांना ठणकावून सांगितले असते, पण हे सरकार आमचे आहे व ते मनापासून काम करीत आहे. तरीही जिथे चुकते तिथे आम्ही बोलणारच म्हणत उद्धव यांनी अप्रत्यक्षरित्या तुम्हीही डोळ्याची झापडे काढवी, असा इशारा दिल्याचे दिसते.
मुख्यमंत्री कोणाचा?
शेतकऱ्यांनी एवढा त्रास सहन करूनही महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीस रथावर स्वार करून दिल्लीस पाठवले. अशा इमानदार शेतकरीवर्गाचे प्रश्न सोडवावे लागतील. मुख्यमंत्री कोण किंवा कोणाचा होणार, या भौतिक प्रश्नात आम्हाला आज रस नाही. शेतकरी चिरडला जातोय. त्याची सुटका करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. भाजपने रथ सोडला आहे व चंद्रकांतदादा त्या रथाचे सारथ्य करणार म्हणजे तो रथ ‘असा तसा’ नक्कीच नसणार, अशी शंका त्यांनी शेवटी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details