मुंबई -मशिदीवरील भोंगे उतरवावे, असे आवाहन राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर राज्यात हनुमान चालीसा पठनाचे ( Hanuman Chalisa Contraversy ) पेव फुटले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने याबाबत ठाम भूमिका घेत भोंगे लावण्याबाबत मार्गदर्शिका ( Guideline For Mosque Loudspeaker ) प्रसिद्ध केली. मात्र, राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन ( All Party Meeting On Mosque Loudspeaker ) करण्यात आले. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी आणि राज ठाकरे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला मनसेच्यावतीने नितीन सरदेसाई ( Nitin Sardesai ) उपस्थित होते. तर भाजपाच्यावतीने कोणीही उपस्थित राहिले नाही. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ही प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले नाहीत.
'विरोधकांना शांतता हवी आहे का?' -राज्य सरकारने आज बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः हजर राहिले नाही. त्यामुळे या बैठकीचं गांभीर्य आधीच कमी झाले. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि राज ठाकरे हे स्वतः हजर राहिले नाही. त्यामुळे या मुख्य विरोधकांना राज्यात शांतता हवी आहे का? राज्य स्थिर करायचे आहे? हा खरा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. प्रत्येकाला आपले राजकीय गोल सेट करायचे आहेत. त्यामुळे शक्य असूनही भाजपाने या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. राज्य अस्थिर करून लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावरून दिसून येते, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.