मुंबई/नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून मोदींच्या २.० मंत्रिमंडळात ४३ नव्या चेहऱ्यांचा संधी मिळाली आहे. आज 36 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली असून सात राज्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन झाले आहे. तसेच १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, डॉ. भारती पाटील व कपील पाटील यांनी संधी मिळाली आहे. या नेत्यांना संधी देताना भाजपने एक बेरजेचे समीकरण केले असून भविष्य़ात राज्यातील राजकारणात भाजपला फायदा होणार आहे.
.. यामुळे नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी व मिळू शकते महत्वाचे खाते -
सध्याच्या घडीला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेण्याची ताकद ज्या नेत्यांमध्ये आहे. त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी असेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. राणे शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
प्रदीर्घकाळ शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री राहिलेले नाराणय राणे यांना शिवसेनेचे अनेक बारकावे माहीत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजप राणेंना मंत्रीपदाचे बळ दिले आहे.
महाराष्ट्रातील मराठा बहुजन चेहरा म्हणून भाजप नारायण राणेंना यापुढे प्रोजेक्ट करणार अशीही शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार असेल तर मराठा नेता सोबत असणे ही त्यांची प्राथमिक गरज आहे. यासाठी नारायण राणे यांना भाजपने केंद्रीय मंत्रीपदाचे बळ दिल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अद्यापही धगधगत आहे. मराठा समाजाचे प्रश्न केंद्रात मांडणारा नेता म्हणूनही आगामी काळात राणेंकडे पाहिले जाण्याची शक्यता आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगर पालिका निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची राहाणार आहे. महापालिका निवडणुकीतही नारायण राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो. शिवसेनेचा गड फोडण्यासाठीही राणेंच्या मंत्रीपदाचा भाजपला फायदा होईल.
ओबीसींना आकृष्ट करण्याबरोबरच शिवसेनेला शह देण्यासाठी कराड यांना संधी -
डॉ भागवत कराड हे राज्यसभेतील खासदार आहेत. डॉ भागवत कराड हे भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. डॉ भागवत कराड हे वंजारी समाजाचे असल्याने ओबीसींचे प्रतिनिधीत्व करतात. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर डॉ भागवत कराड यांना भाजपने केंद्रीय मंत्रिपद देऊन ओबीसींची ताकद आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यात शिवसेनेची ताकद भाजप पेक्षा अधिक आहे. औरंगाबादेत गेल्या २० वर्षांपासून लोकसभेची जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दगा फटका झाल्याने शिवसेनेचा पराभव झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने औरंगाबादसाठी एक मंत्रिपद देण्याची आवश्यकता होती. त्यामुळे खासदार डॉ भागवत कराड यांना संधी मिळाली आहे.
मराठवाड्यातील ओबीसी चेहरा म्हणून डॉ. कराड यांना खासदारकी देण्यात आली होती. राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापत चालले आहे. त्यामुळे ओबीसी खासदाराला संधी देऊन ओबीसी समाजाला संधी दिल्याचा संदेश भाजपने दिला आहे.
डॉ. भारती पवार यांना मंत्रीपद देऊन भाजपने उत्तर महाराष्ट्रातील ताकद वाढवली -
भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. डॉ. भारती पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षांपासून काम केले आहे. स्वत: डॉक्टर असल्याने एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा आहे. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. यामुळे भाजपला ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. भारती पवार यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या. त्यामुळे भाजपने त्यांना गळाला लावून शरद पवारांना धक्का दिला आहे.
भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं घराणं गळाला लावले. मुंबईत भाजप प्रवेशानंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असे म्हटले होते. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचे सूचक वक्तव्य भारती पवार यांनी पक्षप्रवेशावेळी केले होते.
२०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र जवळपास अडीच लाख मतांनी त्या पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत कमळ हाती घेतले. २०१९ मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा जवळपास २ लाख मतांनी पराभव केला होता.
ठाण्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी डॉ. कपील पाटील यांना संधी -
२०१४ मध्ये कपील पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. कपील पाटील आगरी समाजाचे असल्याने ओबीसींना आकर्षित करण्यासाठी डॉ. कपील पाटील यांना भाजपने केंद्रात संधी दिली आहे. सध्या ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे. अशावेळी डॉ. कपील पाटील यांनी मंत्रिपद देणे सूचक आहे. नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे भाजपने आगरी असलेले डॉ. कपील पाटील यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना संधी दिली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत खासदार पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ठाणे शहरात व अन्य उपनगरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील ती गरज पूर्ण करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.
ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील सेनेच्या सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना संधी देण्याचे धोरण भाजपचे असल्याचे बोलले जात आहे.