मुंबई - वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादीकडून मुंबई आणि पुण्यात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले (NCPs lollipop protest over Vedanta). यात राज्य सरकारविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होतं. हे दुर्दैवी आहे. ठाकरे सरकारवर याचं खापर फोडणं अयोग्य आहे. मंत्री आता सांगतायत की, आम्ही यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार -या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प जर आत्ता गुजरातला गेला आहे. तर मग कशाला चर्चा करायची. हा प्रकल्प तळेगांव येथे येणार होता. यावर त्याची चर्चा देखील झाली होती. राज्य सरकारने यासाठी आवश्यक पूर्तता देखील केली होती. पण आज हा प्रकल्प राज्यातून गेला आहे, त्यामुळे यावर चर्चा करू नये. असं यावेळी पवार म्हणाले.
महाराष्ट्राचं प्रचंड आर्थिक नुकसान -राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे NCP MP Supriya Sule यांनी पुण्यात आंदोलन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही ही खूप दुर्दैवी बाब आहे. एखाद्या राज्याला प्रोजेक्ट मिळत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येण्यासाठी ठरलं होत. अस काय झालं की हा प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात गेला. यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. यामुळे लाखो नोकऱ्या हे दुसऱ्या राज्यात गेल्या आहे. हा राजकीय विषय न करता एक्स्पर्ट यांना बोलावून महाराष्ट्राची अस्मिता, तरुणांचं रोजगार यांना वंचित ठेवू नका, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सरकारने दोन मुख्यमंत्री घ्यावे माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे. की त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळे सण उत्सव साजरे करावे. माझं म्हणणं आहे, की राज्यात एक सिरीयस, फोकस, मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री घ्यावे. एकाने यात्रेवर जाव, आणि एकाने राज्य चालवावे. कारण आत्ता जे नुकसान राज्याचं झाल आहे, ते परत होऊ नये, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
प्रकल्प गुजरातला पळवले -वेदांत प्रकल्प नेण्यासाठी कर्नाटक आणि तेलंगणाचा समावेश होता, गुजरातचा नव्हता. मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत वक्तव्य होते की, वेदांता आपल्याकडे येत आहे, परंतु प्रकल्प गुजरातला पळवले जात आहे. यामुळे 1 लाख युवकांना रोजगार मिळाला असता. सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही, दिल्लीच्या बादशहाच्या नेतृत्वात हे सरकार काम करत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.