महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2020, 5:07 PM IST

ETV Bharat / city

'राजगृह'च्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या दादर येथील 'राजगृह' या वास्तूवर अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी सायंकाळी भ्याड हल्ला केला. हल्लेखोरांनी राजगृहच्या आवारात तोडफोड केली. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट आली आहे.

dr babasaheb ambedkars mumbai residence vandalized by unknown mp rahul shevale visit rajgruha
खासदार राहुल शेवाळे

मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या दादर येथील 'राजगृह' या वास्तूवर अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी सायंकाळी भ्याड हल्ला केला. हल्लेखोरांनी राजगृहच्या आवारात तोडफोड केली. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी राजगृहाची पाहणी करून त्यांनी भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली.

राहुल शेवाळे यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे...

'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या 'राजगृह'वर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच या पवित्र वास्तूच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी अनिल देशमुख यांना केली.' असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...व्हिडिओ : 'राजगृह' म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमुल्य ठेवा

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करत स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी राजगृहाला भेट दिली. यावेळी नासधूस केलेल्या भागाचे सुशोभीकरण करून नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश खासदार शेवाळे यांनी पालिकेला दिले. तसेच, या वास्तूजवळ असलेला बस थांबा, सुरक्षेच्या कारणास्तव दुसरीकडे हलवण्याचे आदेशही बेस्ट प्रशासनाला दिले. हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन होईलच, मात्र त्याचवेळी आंबेडकरी अनुयायांनी संयम बाळगावा, असे आवाहनही खासदारांनी केले.

राजगृहाची पाहणी केल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे, आरपीआयचे नागसेन कांबळे, रवी गरुड, प्रतीक कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील 'राजगृह' या निवासस्थानाबद्दल जाणून घ्या...

नेमके प्रकरण काय ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

'राजगृह'च्या घटनेनंतर राज्यातील नेतेमंडळींकडून घटनेचा निषेध आणि कारवाईची मागणी

1. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही : मुख्यमंत्री

'राजगृहाच्या आवारात शिरून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अधिक वाचा -राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2. प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

'मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचे काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी' असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

4. आरोपींना अटक करण्याची फडणवीसांची मागणी

'भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे' असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details