रायगड - वादळ असो वा पावसाळा या नैसर्गिक अपत्तीवेळी नेहमी फटका बसतो तो महावितरणला. निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नगिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, यामध्ये महावितरण कंपनीचे विजेचे खांब, तारा ट्रान्सफार्मर पडून अतोनात नुकसान झाले आहे. वादळ तसेच अतिवृष्टीत वीज सुरळीत सुरू रहावी यासाठी भूमिगत विद्युतवाहनी प्रकल्पाचे काम अलिबाग शहरात सुरू झाले आहे. याच धर्तीवर जिल्ह्यतील श्रीवर्धन, उरण, मुरुड शहर तसेच रत्नगिरीमध्ये दापोली, गुहागर शहरात भूमिगत विद्युत वीज प्रकल्प सुरू करण्याबाबत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत याची मंत्रालयात भेट घेऊन विनंती केली.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा दिला होता. या वादळात विद्युत खांबांचे प्रचंड नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना काळोखात राहावे लागले होते. महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने युध्द पातळीवर काम करून बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केला असून, उर्वरीत ठिकाणी वीजपुरवठा लवकरच सुरू होईल. मात्र, ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी समुद्रकिनारी असलेल्या शहरात भूमिगत विद्युत वीजवाहिनी प्रकल्प होणे गरजेचे आहे.