महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 31, 2020, 5:55 PM IST

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांकडून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी; कोरोना चाचणीचे अहवाल त्वरित देण्याचे आदेश

मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात. अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचे आहे. आपल्या येथे रुग्णांच्या चाचणीचे अहवाल तातडीने मुख्यालयात कसे येईल, हे पाहिले पाहिजे. म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - कोरोना व्हायरसचा मुंबईसह महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. रुग्णांच्या चाचण्या केल्यावर त्यांचे चाचणी अहवाल वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याबाबत मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांचे कान उपटत त्यांनी रुग्णांना त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी परिस्थिती नियंत्रणातच राहिली पाहिजे. त्यासाठी तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीला सुरुवात केली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईमधील लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला वरील निर्देश दिले आहेत. त्यांनी महापालिकेचे उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, यावेळी महत्वपूर्ण सूचना केल्या.

हेही वाचा...Coronavirus : मंत्रालयात महापालिका कर्मचाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण फवारणी

मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात. अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आपल्याला अधिक जलदपणे या संकटात काम करायचे आहे. आपल्या येथे रुग्णांच्या चाचणीचे अहवाल तातडीने मुख्यालयात कसे येईल, हे पाहिले पाहिजे. म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपापल्या वॉर्डमधील खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरू करण्याची विनंती करा. त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या, पण नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे. विशेषत: वस्त्यांमधून स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील, त्याठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुण्यासाठी साबण उपलब्ध असेल, हे सर्व पहा. साथीचा आजार वस्त्यांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिलीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...कोरोनामुळे मरू तेव्हा मरू...! मात्र आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलीय.... ऊसतोड कामगारांची कैफियत...

कोणत्याही परिस्थिती फैलाव थांबवा

वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला. तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे देशातील एक प्रमुख शहर असून आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी कोणत्याही परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे. त्यासाठी तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना अति धोका

आपल्याकडे कोरोना बाधित रुग्णांमध्ये २० ते ४० गटातील रुग्ण आहेत. परंतु खऱ्या अर्थाने कोरोनामुळे वृद्ध नागरिकांना अधिक धोका असतो, हे लक्षात घेऊन अशा ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करा. ही साथ ज्येष्ठ नागरिक वयोगटात पसरली तर नियंत्रणासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. १२ मार्चपासून २३ मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती अधिक बारकाईने तपासा. त्यांना क्वारंटाईन करण्याची आवश्यकता असेल तर ते कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्या कोणत्याही परिस्थितीत शोधा. तंत्रज्ञानाची मदत घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा...COVID-19 : इटलीमध्ये 24 तासांत कोरोनाचे 812 बळी; तर, 1648 नवे बाधित रुग्ण

सोसायट्यांनी फवारणी करू नये

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये. फवारणी करायची असल्यास संबंधित भागाची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यकता भासल्यास महापालिका तेथे फवारणी करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील

आपण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने सुरू ठेवली. मात्र. याचा गैरफायदा घेऊन लोक फिरायला निघाल्यासारखे निघत आहेत. असे असेल तर ही सोय बंद करण्याचा कठोर निर्णय प्रसंगी घ्यावा लागेल. कोरोना रोखायचा आहे. हे आव्हान आपण पेलले असून राज्य सरकार पालिकेच्या संपूर्ण पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच, उपायुक्त, तसेच प्रभागांशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची नियमित कामे आणि कोरोनाच्या नियंत्रणासाठीचे काम यात व्यवस्थित नियोजन करावे. कामाचे नीट वाटप करावे. स्वत:वरचे इतर कामांचे ओझे कमी करून कोरोनावर लक्ष केंद्रित करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details