मुंबईतील जैन मंदिरांना दिलासा; दिवाळीतील 5 दिवस 'सशर्त' राहणार खुली
एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिवाळीच्या 5 दिवसांसाठी मुंबईतील 2 जैन मंदिरे खुली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात 5 दिवसांसाठी मुंबईतील 102 जैन मंदिर उघडण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई -कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्यभरातील सर्व धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात आली. सध्य स्थितीतही ती बंद आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिवाळीच्या 5 दिवसांसाठी मुंबईतील 2 जैन मंदिरे खुली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात 5 दिवसांसाठी मुंबईतील 102 जैन मंदिर उघडण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.
एका वेळी 8 जणांना जैन मंदिरात 15 मिनिटांसाठी प्रवेश-
न्यायालयाने धार्मिक स्थळे उघडी करण्याच्या निर्णयासोबत काही निर्बंधही लागू केले आहेत. एका वेळेस आठ जणांना या मंदिरात प्रवेश देण्यात यावा आणि तो 15 मिनिटांपेक्षा अधिक नसावा, अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने घातली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये एस जे काथावाला व अभय अहुजा या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर दादर व भायखळा येथील जैन मंदिरांच्या ट्रस्टने ही याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर राज्य शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जैन मंदिरांना दिलासा देत सकाळी 7 ते दुपारी 1 व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुली करण्यास परवानगी दिली आहे.
या निर्णयाचा मुंबईतील 102 मंदिरांना फायदा-
दिवाळीच्या 5 दिवसांसाठी म्हणजेच 13 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली राहणार आहेत. मुंबईत एकूण 102 जैन मंदिर असून ती सुद्धा या दरम्यान खुली राहणार आहेत. याचिका कर्त्यांकडून उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना 'महाराष्ट्र शासनाकडून व्यायामशाळा, बार आणि रेस्टॉरंट, मॉल, मेट्रो रेल्वे व बस या सर्व सार्वजनिक गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिर उघडण्यास अद्याप परवानगी दिली नाही, अशा प्रकारची परवानगी देण्यात यावी' अशी की मागणी करण्यात आलेली होती.