मुंबई - भोंग्यांनंतर राज्यात हनुमान चालीसाचे राजकारण (Hanuman Chalisa Controversy) सुरू झाले. जवळपास सर्वच पक्षांचे नेते आता आपल्या जाहीर सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये एका दमात हनुमान चालीसा म्हणून दाखवू लागले आहेत. त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे असे म्हणावे लागेल. मोठ्या नेत्यांच्या या स्पर्धेमुळे आता छोटे नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील हनुमान चालीसाचे पाठांतर करायला सुरुवात केली आहे. या राजकारणामुळे अनेक पुस्तक विक्रेत्यांकडे (Hanuman Chalisa Book Sale Hike in Mumbai) मात्र आता हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी वाढली आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही मुंबईच्या गिरगाव परिसरात मागची 78 वर्ष धार्मिक पुस्तकांची विक्री करणारे 'बळवंत पुस्तक भांडार' (Balvant Pustak Bhandar Girgaon) गाठले. या दुकानाचे मालक मकरंद परचुरे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
हेही वाचा -Ajit Pawar in Aurangabad : हनुमान चालीसा आपल्या घरी म्हणा, इथेच का? अजित पवारांची टोलेबाजी
हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी वाढली - परचुरे सांगतात की, "हनुमान चालीसाच्या पुस्तकांची मागणी पहिली सुद्धा होती. मात्र, तेव्हा एखादी काही अडचण आल्यास अथवा एखाद्या ज्योतिषाने पुस्तक वाचन करायला सांगितलं तर लोक हनुमान चालीसा घेऊन जात होते आणि वाचत होते. मात्र, आता हे सर्व सुरू झाल्यापासून या मागणीत थोडी वाढ नक्कीच झाली आहे. हनुमान जयंतीच्या वेळी चांगला खप झाला. लोकांची मागणी जास्त होती. हा वाद सुरू होण्याआधी सुद्धा लोक पुस्तक मागायची पण प्रमाण कमी होतं ते आता नक्कीच वाढलेय."