महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 31, 2021, 9:56 PM IST

ETV Bharat / city

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू करण्याचा दोन दिवसात निर्णय - उदय सामंत

शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून राज्यातील ५ वी ते ८ वी इयत्तेचे वर्ग सुरु केले आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांतील वर्ग प्रत्यक्ष भरवले जात नाहीत.

उदय सामंत
उदय सामंत

मुंबई -मुंबईसह राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद पडलेली राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी सर्व कुलगुरूंची बैठक घेतली जाईल. या बैठकित महाविद्यालयांचे वर्ग कशा पद्धतीने भरवावेत, कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा करून निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही सामंत म्हणाले.

राज्यातील २० कुलगुरुंनी घेतला पुढाकार-

शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून राज्यातील ५ वी ते ८ वी इयत्तेचे वर्ग सुरु केले आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांतील वर्ग प्रत्यक्ष भरवले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील २० कुलगुरुंनी पुढाकार घेतला असता त्यांची राज्यपालांसोबत शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.

सामंत यांनी राज्यपालांची घेतली भेट -

महाविद्यालये उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे. मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा, अशी विनंती सर्व कुलगुरुंनी राज्यपाल यांच्याकडे या माध्यमातून केली होती. अखेरीस रविवारी सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली व महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून कुलगुरूंची बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले.

महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले असले तरी महाविद्यालयांची साफसफाई व इतर कामांसाठी वेळ जाणार असल्याने आणखी पंधरा दिवस तरी महाविद्यालये सुरू होऊ शकत नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये

सार्वजनिक व खाजगी एकुण विद्यापीठे - ६२
अधिपत्याखालील महाविद्यालये - ४ लाख ५७१
स्वायत्त शिक्षण संस्था - २ हजार २६२

विद्यार्थ्याची संख्या

विद्यार्थी संख्या ( २०१९-२०)
- ४२ लाख ६० हजार
- शिक्षक संख्या -१ लाख ५८ हजार

हेही वाचा-पेट्रोलचे दर शंभर रुपये, घ्या अच्छे दिन - उपमुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details