मुंबई -पालिका मुख्यालयातील शहर स्थापत्य समितीच्या सभेत अचानक काच पडल्याची घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसात स्थायी समितीच्या बैठकीत उमटले आहेत. महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहांमध्ये लावण्यात आलेले झुंबर आणि काचेची तावदानेही पडतील, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. समितीचा कारभार चालवण्यासाठी हेल्मेट घालून बसावे लागेल, अशी टीका प्रशासनावर होत आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यालयातील सर्व इमारतींमधील काचेच्या तावदानांसह झुंबरांचे ऑडीट करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
समिती अध्यक्षा प्रिती पाटणकर यांच्यासह तीन अधिकारी या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या घटनेबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यालयातील सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही दुर्घटना होत असल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे. तसेच, स्थायी समिती सभागृहातील कॅन्टींनमध्ये नाश्ता, जेवण करताना ताटात एसीचे पाणी टपकते. वारंवार तक्रार करुनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.