मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानीच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्यापासून (२ डिसेंबर) आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींना भेटून चर्चा करणार आहेत. बॉलिवूडपेक्षा मोठी चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेश उभारण्याची योगी यांनी नुकतेच घोषणा केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी 7 वाजण्याच्या सुमारास मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होणार आहेत. रात्री आठच्या सुमारास ते मुंबईत पोहोचतील. त्यानंतर उद्या सकाळी (2 डिसेंबर) ते एका छोटेखानी कार्यक्रमात जातील. त्यानंतर ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यानंतर उद्योजक व गुंतवणूकदार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील भाजप नेत्यांचीदेखील ते भेट घेतील.
मुंबईतून उत्तरप्रदेशातल्या इतर शहरांचाही बॉण्डची होऊ शकते घोषणा
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून योगी आदित्यनाथ यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. उद्या योगी आल्यांनातर एका छोटेखानी सोहळ्यात लखनऊ महापालिकेच्या (LMC) पहिल्यावहिल्या बाँडचे अनावरण करणार आहेत. लखनऊ महापालिकेने शहराचं सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता इ. कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बाँड जारी केला आहे. या बाँडला गुंतवणूकदारांची जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बाँड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजिायाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर इ. शहरांसाठी देखील बाँड काढण्याची घोषणा उद्या योगी करू शकतात.
हेही वाचा-बॉलिवूडला साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार; उद्योजकांशीही करणार चर्चा
मुंबईतून उत्तरप्रदेशात उद्योजकांना गुंतवणूक करण्याचे आवाहन
आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ उद्योजक-बँकर्स आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींसोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन करतील. बुधवारी योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अॅण्ड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी इ. उद्योजकांना भेटतील. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही ते भेट घेतील अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा-बिहार निवडणूक : काँग्रेसने देशात दहशतवाद वाढवण्याचे काम केले - योगी आदित्यनाथ
योगींच्या दौऱ्यावर काय म्हणाले विरोधक
महाराष्ट्रात येऊन कोणी काही घेऊन जाऊ शकत नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यावतीने ऑनलाईन परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रॅंड अम्बॅसिडर होऊन इतर उद्योजकांना सांगितले तर, इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील.
मॅग्नेटीक महाराष्ट्रासाठी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटीक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
योगींनी उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारावी - अस्लम शेख
योगी आदित्यनाथ हे उद्या मुंबईत येऊन येथील बाॅलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित लोकांशी तसेच उद्योगपतींची भेट घेणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण सूरू आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून मुंबईंचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. असे प्रयत्न यापूर्वीही करण्यात आलेले आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे योगींनी आधी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये भोजपूरी चित्रपटांना सोयी सुविधा द्यावी, अशी टीका मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. मुंबई हे सर्व जाती धर्माच्या आणि प्रांतांच्या लोकांना सामावून घेणारे शहर आहे. त्यामुळेच उद्योग व्यवसाय येथे बहरले आहेत. असे भयमुक्त वातावरण उत्तर प्रदेशमध्ये नाही. तेथे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे आधी उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राप्रमाणे भयमुक्त वातावरण तयार करा, नंतर येथील उद्योगधंदे व बाॅलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेण्याची स्वप्न पहा, असा टोलाही अस्लम शेख यांनी लगावला.
महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा डाव - सचिन सावंत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ) हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योजक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.
बॉलिवूडला बदनाम करण्याचे काही जणांचे कारस्थान - उर्मिला मातोंडकर
आजच शिवसेनेत प्रवेश केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल म्हटले आहे, की बॉलिवूड आणि मुंबईचे रक्ताचे नाते आहे. मुंबईवर आपला हक्क असून मोजक्या लोकांमुळे बॉलिवूड बदनाम होत असल्याची टीका मातोंडकर यांनी केली. याचसोबत बॉलिवूडसाठी कोणत्याही परिस्थितीत उभी राहीन, असे त्या यावेळी म्हणाल्या.