महाराष्ट्र

maharashtra

पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल, पाणी ओसरताच पंचनाम्यांना प्राधान्य द्या : उपमुख्यमंत्री

By

Published : Jul 28, 2021, 2:45 AM IST

पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल, अशी ग्वाही देवून पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

ajit pawar
अजित पवार

कोल्हापूर - पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल, अशी ग्वाही देवून पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत येथील राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत घेतलेल्या आढाव्याची त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार -

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग (एनएच 4) बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 2005, 2019 व 2021 मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करुन महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे त्यांनी सांगितले. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती, राडारोडा साचून नदीपात्रात गाळ साचला असल्यास नदीचा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का याचा अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. याबरोबरच नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊ नये, यासाठी नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी यंत्रणेला केल्या.

अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने करा -

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने करा. काही रस्त्यांवर ब्रिटीशकालीन मोऱ्या आहेत. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने यापुढे ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची बांधणी करा. पुरग्रस्तांसाठी मदतकार्याबरोबरच या भागातील साफसफाई करुन घ्यावी तसेच मोफत अन्नधान्य वितरणावर लक्ष द्यावे. पूरग्रस्त भागासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अत्याधुनिक बोटी घ्या, असे सांगून सब मर्शिबल पंप, सक्शन यंत्र व अन्य यंत्रसामग्री घेण्यासाठी शासन मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस

कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी गावातील उंच ठिकाणच्या गायरान जमिनींची निवड करावी -

यावेळी अजित पवार म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी गावातील उंच ठिकाणच्या गायरान जमिनींची निवड करावी. जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, जवाहर आणि शरद या साखर कारखान्यांच्या परिसरात "रहिवासी चाळ" उभी केल्यास कायमस्वरुपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होईल. इतर वेळी ऊसतोड कामगारांची याठिकाणी व्यवस्था होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर वेळेत वीजबिल भरणा करणारा जिल्हा -

राज्यात वेळेत वीजबिल भरणा करणारा कोल्हापूर जिल्हा आहे, याबद्दल कोल्हापूरकरांचे कौतुक करुन गरज भासल्यास अधिक मनुष्यबळ घ्या, पण जिल्ह्यातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा, अशा सूचना केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पूरपरिस्थितीत देखील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये, यासाठी उपाययोजना करायला सांगितले असल्याचेही त्यांनी म्हंटले.

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख -

पूर परिस्थितीमुळे झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख, केंद्र शासनाकडून 2 लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना केल्या. दरम्यान, यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.

हेही वाचा -Weather Forecast : पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details