कोल्हापूर - दरवर्षी नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक आंबाबाई तसेच ज्योतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापूरात येत असतात. यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमावलीनुसार ऑनलाइन ई-पास काढून तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर ज्योतिबा मंदिरातही अडीच लाखांच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
माहिती देताना शिवराज नाईकवाडे गतवर्षी कोरोनामुळे भाविकांविना नवरात्रोत्सव
गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यामुळे नवरात्रोत्सवही भाविकांविनाच पार पडला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालून मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी ऑनलाइन ई-पासची सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने भाविकांनी अंबाबाई तसेच ज्योतिबाचे दर्शन घेतले.
योग्य नियोजन आणि सुरळित दर्शन
एकाचवेळी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करू नये यासाठी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन्ही दिवशी सुमारे 700 भाविकांना एका तासाला दर्शन देण्यात आले होते. मात्र, अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहत असल्याने यामध्ये वाढ करून तब्बल 1 हजार 500 भाविकांना एका तासाला दर्शन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतले तर अडीच लाखांच्या आसपास भाविकांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले. यामध्ये कोरोनाचे नियम पाळून सर्वच भक्तांना अंबाबाई मंदिरात सोडले जात होते.
20 ऑक्टोबरपर्यंत ई-पासद्वारेच दर्शन
दरम्यान, भाविकांचा अंबाबाई तसेच ज्योतिबा मंदिरात दर्शनाचा ओघ पाहता उद्या 20 ऑक्टोबरपर्यंत ई-पासची सेवा अशीच सुरू ठेवण्यात आली आहे. उद्यापासून यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप याबाबत निर्णय घेतला गेला नसल्याची देवस्थान समीतिचे सचिव शिवराज नायकवडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली. शिवाय ई-पासऐवजी आणखी इतर निर्बंध घालून दर्शन देता येईल का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा -वही पुस्तकांना हळद-कुंकू हार घालून दिल्या शासनाला; स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अनोखे आंदोलन