अमरावती - राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायम आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात केवळ 20 हजार लसीचे डोस प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता मिळालेले 20 हजार ते डोस संपल्याने जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्रातील 125 पैकी 75 पेक्षा जास्त लसीकरण केंद्राना टाळे लागले आहे.
तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सहा लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 2 लाख 37 नागरिकांनी कोरोना प्रतिनबंधक लस टोचून घेतली आहे. दरम्यान आता लस केव्हा मिळणार, ही प्रतीक्षा मात्र पुन्हा सुरू झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी-
राज्यात मागील दोन महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर 60 वर्षावरील नागरिकांना आणि आता 45 वयोगटातील नागरिकांना लस देणे सुरू आहे. परंतु केंद्र सरकारकडून लस पुरवठा हा कमी होत असल्याने राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातही ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
साडेचार लाख लसींची मागणी-
जिल्ह्यात सध्या लसीकरणाला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण हे सर्व केंद्रावर सुरळीत ठरवण्यासाठी साडेचार लाख लसींच्या डोसची मागणी केल्याचं जिल्हा परीषदचे आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी सांगितले.
हेही वाचा -गूड न्यूज! यंदा सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा अंदाज!