अमरावती -आतापर्यंत सत्तेत असणारे विकासाची मलाई स्वतःच चाखत होते. आज अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेली दहीहंडी स्पर्धेची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने विकासाची दहीहंडी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी महाराष्ट्रात विकासाची हंडी फोडू आणि या हंडीतील विकासाची मलाई महाराष्ट्रातील प्रत्येक जण चाखेल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis म्हणाले. ते आज अमरावतीत नवाथे चौक येथे आयोजित युवा स्वाभिमान संघटनेच्या दहीहंडी Yuva Swabhiman Dahihandi Amravati उत्सवाला संबोधित करताना बोलत होते.
'आमच्या राज्यात सर्वच गोष्टींचे स्वातंत्र्य' :गेली अडीच वर्ष राज्यात अनेक बंधने होती. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना कारावासात टाकले जायचे. आता मात्र आमच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सन्मान राखल्या जाईल. गेली दोन वर्ष कुठलेही सण उत्सव राज्यात आनंदात साजरे झाले नाही. आता मात्र या दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणपती उत्सव त्यानंतर नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी सारे काही प्रत्येकाला अतिशय आनंदात साजरा करता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'खासदार आमदार आता कमळावरच निवडून येणार' :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेली कुठलीही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाळत नाहीत. यामुळे अमरावती जिल्ह्याचा झपाट्याने विकास होतो आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे दहीहंडी सोहळ्याला संबोधित करताना म्हणाले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघाचा खासदार हा कमळावरच निवडून येणार आणि बडनेरा मतदारसंघात देखील कमळ हे बोधचिन्ह असणाराच आमदार निवडून येईल, असे बावनकुळे यांनी म्हणाले.