महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 30, 2021, 8:52 PM IST

ETV Bharat / city

रोहयो अधिकारी मृत्यू प्रकरण; अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांचा दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Officer Pramod Nimburkar
कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर

अमरावती -अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीचे रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांचा दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपल्यावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्याकडून अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच, आपली बाजू न ऐकता आपल्याला कार्यमुक्त केल्याचा आरोप करत मी आत्महत्या करत असल्याचे देखील प्रमोद निंबुरकर यांनी म्हटले होते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात की आत्महत्या? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी सभागृहात फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकूण दाखवल्यानंतर आणि ईटीव्ही भारतने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी घेतली असून आता या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा -सायकल पंचर होते म्हणून 'हा' पठ्या चक्क घोड्यावरून जातो शाळेत, वाचा...

काय आहे प्रकरण..?

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबुरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी प्रमोद निंबुरकर यांच्यावर कामात हयगय, अनियमितता, वारंवार सांगूनसुद्धा कामात सुधारणा नाही, कामात दिरंगाई, लोकांची दिशाभूल आदी कारणांचा ठपका ठेऊन त्यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांनीही कुठलीही शहानिशा न करता व बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा निंबुरकर यांनी केला होता. वरुडच्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोर्शी ते वरुड रोडवर प्रमोद निंबुरकर यांचा दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघात झाला. हा अपघातात की आत्महत्या ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय आहे गटविकास अधिकारी यांच्या पत्रात?

अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्यावर कामात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता. त्या संदर्भात त्यांनी रोहयोचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पत्र लिहले होते. यामध्ये प्रमोद निंबुरकर हे स्वतः ऑफिसला उपस्थित न राहता अगोदर स्वाक्षरी करून व खोटा दौरा टाकून ऑफिसला गैरहजर राहत, वारंवार सांगून सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिओ - टॅगिंग प्रलंबित ठेवणे, प्रवीण साहेबराव देशमुख यांची फाईल त्रूटीत असून सुद्धा त्यांना काम करून देतो, असे सांगून दिशाभूल करणे.पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना माझे काम पूर्ण झाले गटविकास अधिकारी यांच्याकडे सर्व कामे प्रलंबित असल्याचे सांगून गटविकास अधिकारी यांच्याविरोधात कार्य करणे. पंचायत समिती कार्यालय तिवसाची बदनामी करणे. संधी देऊनही असमाधानकारक स्पष्टीकरण सादर करणे, कर्तव्य प्रति निष्ठा न ठेवणे आदी बाबी या पत्रात नमूद करण्यात आल्या होत्या.

पत्र
पत्र

गौरी देशमुखांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

अमरावतीच्या जिल्हा परिषदत जल व्यवस्थापनाची बैठक सुरू असतानाच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सभागृहामध्ये सर्वांना ऐकून दाखवली, त्यानंतर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये?

प्रमोद निंबुरकर यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी कैफियत मांडली होती. त्यांनी म्हटले होते, की मी कोणता भ्रष्टाचार केला नाही. मी कोणतीही चूक केली नाही. मी सरकारची चौकट तोडली नाही. परंतु, माझ्यावर झालेला अत्याचार मी कधी सहन केला नाही. मी कामात हुशार होतो. माझ्यावर कुठलाही आरोप नसताना माझ्यावर अत्याचार झाला. साहेब, तुम्ही माझी चौकशी न करता मला कामावरून कसे कमी केले. माझी कुठलीही चुक नसताना जिल्हाधिकाऱ्यांची सही घेऊन कार्यमुक्त केले. मला संधी का दिली नाही

न्याय मागण्यासाठी अपील करण्याचाही सल्ला

या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना प्रतिक्रिया विचारली. यासंदर्भात लंके म्हणाले की, कामात अनियमितता असल्याने बीडीओ यांनी दिलेल्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव माझ्याकडे आला होता. त्यानुसार त्यावर मी सही करून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनादेखील पाठविला होता. आत्महत्या करू नको, असे मी त्यांना वारंवार सांगितले. त्यांनी आत्महत्या केली नाही, त्यांचा अपघात झालेला आहे. त्यांना न्याय मागण्यासाठी अपील करण्याचाही सल्ला आम्ही दिला होता. तशी प्रक्रिया ही सुरू झाली होती.

प्रमोद निंबुरकर मृत्यू प्रकरणाविषयी डॉ. चेतन जाधव यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा -राज्यातील ग्रामपंचायती फायबर रेंजने जोडण्यात येणारं -सतेज पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details