मुंबई - कोरोना आणि टाळेबंदीमुळे बांधकाम क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र त्यानंतरही किमती कमी न करण्याची आठमुठी भूमिका बिल्डरांनी घेतली होती. पण परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालल्याने अखेर बांधकाम विकासक (बिल्डर) नरमले आहेत. विक्रीअभावी घरे पडून राहू नये, याकरता त्यांनी घरांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत काही विकासकांनी चक्क रेडीरेकनरच्या दरापेक्षाही कमी दरात घरे विकल्याच्या घटना गेल्या दिवसात घडल्या आहेत. टाळेबंदीमुळे घरांच्या किमती कमी होतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण विकासकांनी घरांच्या किमती कमी करण्यास नकार दिला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि विकासकांमध्ये घरांच्या किमती कमी करण्यावरून एका वेबिनारमध्ये खडाजंगी झाली होती. किमती कमी करण्याची पियुष गोयलांची सूचना विकासकांनी धुडकावून लावली होती. मात्र, आता घरखरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने येणाऱ्या ग्राहकांना स्वस्तात घरे विकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
अशा कमी दराने फ्लॅटची झाली विक्री
नरिमन पॉईंट येथे 144.98 चौ. मी. च्या व्यावसायिक मालमत्तेची चक्क रेडीरेकनरच्या दरापेक्षा कमी दरात विक्री झाली आहे. या मालमत्तेची किंमत रेडीरेकनरनुसार 5 कोटी 14 लाख रुपये अशी आहे. पण, ही जागा 4 कोटी 85 लाख रुपये या किमतीत विकली गेली आहे. तर 11 जूनला महालक्ष्मी येथील 1 हजार 736 चौ. फुटाचा निवासी फ्लॅट 2 कोटी 69 लाखांत विकला गेला आहे. प्रत्यक्षात त्या फ्लॅटचा रेडीरेकनर दर 2 कोटी 83 लाख रुपये आहे. कमी किमतीत मालमत्ता विकत घेता आल्याने ग्राहक खुश आहेत.
काय होता घरांच्या किमतीचा वाद?
देशातील बिल्डरांनी घरांच्या किमती त्वरित कमी करत ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी सूचना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. मात्र,बिल्डरांनी आताच्या परिस्थितीत किमती कमी करणे शक्य नसल्याचे म्हणत ही सूचना फेटाळून लावली आहे. पियूष गोयल आणि बांधकाम विकासकांतील वादावरून सोशल मीडियात चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई-नवी मुंबई-ठाण्यातील विकासकांनी घरांच्या किमती कमी करण्याची गोयल यांची सूचना नाकारली होती. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय), महाराष्ट्र आणि क्रेडाय-एमसीएचआयही किमती कमी न करण्यावर ठाम राहिली आहे.
केंद्राने 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. पण प्रत्यक्षात एक रुपयाही बिल्डरांना मिळालेला नाही. फक्त रेराअंतर्गत प्रकल्प पूर्णत्वासाठी 6 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यात ही व्याज आकारले जाणार आहे. मग आमच्याकडून किमती कमी करण्याची अपेक्षा सरकार कशी करू शकते, असा सवाल नवी मुंबईतील बिल्डर राजेश प्रजापती यांनी केला होता.
गेल्या 5 वर्षांपासून बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदी सोसत आहेत. त्यात आता तीन महिने काम बंद आहे. जवळपास 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तेव्हा किमती कमी करत आम्ही अधिक नुकसान करून घ्यायचे का?, असाही त्यांनी सवाल केला होता. इतकेच नव्हे तर गोयल यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, विकासकांकडून रेडी रेकनरपेक्षा कमी दरात घरांची विक्री क्वचित होते. पण, आता मात्र यापुढे हाच ट्रेंड पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे येत्या काळात घरे स्वस्त होतील, अशी आशा स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.