नवी दिल्ली- भारत हा चीनवर इलेक्ट्रिक मशिनरी, यांत्रिकी उपकरणांसाठी अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या ४८ महिन्यांत ४३ टक्के भारतीय ग्राहकांनी चीनच्या उत्पादनांकडे पाठ फिरविली आहे. ही माहिती लोकलसर्कल्सच्या सर्वेक्षणामधून समोर आली आहे.
गतवर्षी गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले होते. त्यानंतर ग्राहकांच्या वर्तवणुकीबाबत लोकल सर्कल्सने सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये ग्राहकांपुढे कमी किमतीमध्ये चीनी उत्पादने खरेदी करण्याचा पर्याय नव्हता. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी लागू असल्याने लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने त्यांच्या खरेदीवर परिणाम झाला. गेल्या १२ महिन्यांत ४३ टक्के ग्राहकांनी चीनी उत्पादने खरेदी केली नाहीत. या सर्वेक्षणाची माहिती ईटीव्ही भारतला मिळाली आहे.
हेही वाचा-पुण्यातील कंपनीने तयार केला कोरोना व्हायसरला निष्क्रिय करणारा मास्क
भारतात चीनप्रमाणे कमी दरात उत्पादने नाहीत!
- लोकल सर्वेमध्ये देशातील २८१ जिल्ह्यांमधील १८ हजार जणांकडून प्रतिसाद घेण्यात आला. ज्यांनी चीनी उत्पादने यापूर्वी खरेदी केली होती, त्यापैकी ६० टक्के जणांनी १ किंवा २ उत्पादने खरेदी केली आहेत. चीनी उत्पादनांप्रमाणे कमी किमतीत दर्जा असलेली भारतामध्ये उत्पादने उपलब्ध नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.