ठाणे- कोरोना सारख्या महामारीत ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालयात बंदीचा फतवा काढणाऱ्या प्रशासनाच्या अमानवीय कृतीबद्दल ग्रामीण जनतेत तिव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यात ग्रामीण विरुद्ध शहरी असा संघर्ष पेटून ग्रामीण जनता आपल्या भागातून शहरी भागात जाणारे पाणी बंद करतील. असा लेखी इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक वसाहती यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जमिनी संपादित करून व शेतकऱ्यांचे पुनर्वसन अर्धवट ठेवूनसुध्दा मुंबईसह ठाणे, भिवंडी, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवीमुंबई या महानगरपालिका व अंबरनाथ व कुळगाव बदलापूर या नगरपालिका व औद्योगिक वसाहती या क्षेत्राला मुरबाड, शहापूर व अंबरनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागात धरणे बांधून आणि येथील शेतकऱ्यांचे अर्धवट विस्थापन करून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमधून ग्रामीण भागातील एकाही गावाला पाणीपुरवठा केला जात नाही. शिवाय या महानगरपालिकांचा या ग्रामीण भागाला काहीही उपयोग नाही. या महानगरपालिकांनी आपले स्वतःचे अस्तित्व जोपासण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी राज्य सरकार, महापालिका व एमएमआरडीए यांच्या माध्यमातून मोठमोठी रुगणालये उभारण्याचे काम केले आहे. सर्व सोईसुविधायुक्त या रुग्णालयात केवळ महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचाच अधिकार ( हक्क ) आहे. असे फतवे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काढले असल्याचे भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले.