मुंबई- विलगीकरण कक्षातील महिला देखील असुरक्षित वातावरणात राहत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत मनसेने महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विलगीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.
मागील आठवड्यात पनवेल येथील क्वारंटाईन सेंटर येथे महिलेवर झालेल्या बलात्काराची संतापजनक घटना लक्षात घेता, पुन्हा असले प्रकार घडू नयेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भांडुप विभागाच्यावतीने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी एस विभागातील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्या, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, भांडुप विभागाच्या वतीने एस विभागचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांना देण्यात आले. तसेच या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.