हैदराबाद - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) धाड पडल्यानंतर अनेकांची तारांबळ उडते. तेलंगणातील कल्वाकुर्तीमध्ये एका व्यक्तीने एसीबीचा छापा पडल्यानंतर घरातील गॅस पेटवून नोटा जाळण्याची घटना घडली. यात त्याने जवळपास 5 लाख रुपये जाळल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरेन्टकुंटा तांडा सरपंच रामुलू यांनी वेल्डंडा मंडल बोलपंपल्ली येथे खडी गिरणी चालविण्यासाठी खाण विभागाला परवानगी मागितली होती. यासंदर्भात रामुलू यांना तहसीलदार व्यंकटय्या गौड यांनी कल्वाकुर्ती येथील आपल्या घरी भेटण्यास बोलावले. काम पूर्ण करण्यासाठी तहसीलदार व्यंकटय्या गौड यांनी 6 लाख रुपयांची लाच मागितली. रामुलू त्यांना पाच लाख रुपये देण्यास तयार झाले. याचबरोबर रामुलू यांनी दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे व्यंकटय्या गौड यांची तक्रार केली.
तेलंगणामध्ये एसीबीची धाड पडताच तहसीलदाराने जाळले पाच लाख रुपये एसीबीने रचला सापळा -
रामुलू यांच्या तक्रारीनंतर व्यंकटय्या गौड यांना अटक करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रामुलू यांना पैशासह व्यंकटय्या गौडच्या घरी पाठवले. रामुलूने पैसे सोपवल्यानंतर लागलीच एसीबीने व्यंकटय्याच्या घरी धाड टाकली. यानंतर घाबरलेल्या व्यंकटय्याने घराची सर्व दारे बंद केली आणि गॅस पेटवून नोटा जाळल्या. अखेर प्रयत्नानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरात शिरण्यात यश मिळवलं. मात्र, तोपर्यंत बऱ्याच नोटा जळाल्या होत्या.
देशातील भ्रष्टाचार थांबता थांबेना -
सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे. या कोरोनाच्या संकटात पैशाच्या विवंचनेत अनेकांचे बळी गेलेत. मात्र, भारतातील प्रशासकीय यंत्रणेतील भष्ट्राचार कमी झाल्याचे चित्र नाही. भारतात प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार हा नेहमीच चिंतेचा एक विषय राहिला आहे. यावरुन भारतात नेहमीच बदलाची अपेक्षा व्यक्त केली गेलीय मात्र, त्यात फार काही फरक पडल्याचे चित्र नाही.
हेही वाचा -नेत्यांच्या सभा, शुटिंग सुरू, पण उद्योगांना बंदी! अनिल अंबानी यांच्या मुलाची लॉकडाऊनवर टीका