महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळमध्ये 'एलडीएफ'चा ऐतिहासिक विजय; ४० वर्षात पहिल्यांदाच सत्ता कायम

गेल्या चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच केरळमध्ये एका सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. हा विजयदेखील एलडीएफने थोड्याफार फरकाने नाही, तर यूडीएफचा धुव्वा उडवत मोठ्या फरकाने मिळवला आहे.

By

Published : May 3, 2021, 9:28 AM IST

Left creates sets history in Kerala; Wins the second consecutive term
केरळमध्ये 'एलडीएफ'चा ऐतिहासिक विजय; ४० वर्षात पहिल्यांदाच सत्ता कायम

तिरुवअनंतपुरम : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेतृत्त्वाखाली लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ने केरळमध्ये इतिहास रचला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच केरळमध्ये एका सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. हा विजयदेखील एलडीएफने थोड्याफार फरकाने नाही, तर यूडीएफचा धुव्वा उडवत मोठ्या फरकाने मिळवला आहे.

या विजयानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, की जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आणि आम्ही जनतेवर. विरोधी पक्षांनी केलेल्या कित्येक आरोपांनंतरही जनतेने पिनराई सरकारवर विश्वास दाखवला. पिनराई विजयन यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती, तसेच शबरीमला आणि इतर मुद्द्यांवरुनही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र, तरीही केरळच्या १४ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये लोकांनी विजयन यांच्यावर विश्वास दर्शवला.

यूडीएफ केवळ तीन जिल्ह्यांमध्ये प्रभावी..

मलबार भाग आणि उत्तर केरळमधील कासारगोड, कन्नूर, कोळीकोड आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये डाव्यांची पकड आणखी घट्ट झालेली पहायला मिळाली. यासोबतच थिस्सूर, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांनीही एलडीएफला पसंती दर्शवली. तसेच आलापुळा, पठानमथिट्टा, कोल्लम आणि तिरुवअनंतपुरममध्येही एलडीएफचा विजय झाला. यूडीएफला केवळ वायनाड, एर्नाकुलम आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये समाधान मानावं लागलं.

भाजपाचे 'शटर डाऊन'!

भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या एनडीएला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. यावेळी गेल्या विधानसभेपेक्षा जास्त जागा मिळवून किंगमेकर ठरण्याचा दावा भाजपा करत होते. गेल्या विधानसभेमध्ये भाजपाला केवळ एका जागेवर (नेमॉम) विजय मिळवता आला होता. ती जागाही भाजपाला पुन्हा मिळवता आली नाही. भाजपाकडून तिकीट मिळालेले मेट्रो मॅन ई. श्रीधरन आणि कुम्मनम राजशेखरन या दोघांनी चांगली लढत दिली. सुरुवातीच्या काही फेऱ्यांचे कल समोर येईपर्यंत हे दोघेही आघाडीवर होते. मात्र, या दोघांचाही पराभव झाला.

विशेष म्हणजे, विजयन यांनी यापूर्वी एका प्रचारसभेमध्ये म्हटले होते, की या निवडणुकीत मी भाजपाचे 'शटर डाऊन' करेल; आणि तसंच झालंही.

कोरोना काळातील कामाचे बक्षीस..

कोरोना काळात पिनराई सरकारने केलेल्या कामावर लोकांनी दाखवलेला हा विश्वास आहे, असंही काही म्हणत आहेत. आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना मिळालेलं ६१ हजार मताधिक्य हे त्याचीच पावती आहे. मुख्यमंत्री 'कॅप्टन' विजयन यांनादेखील ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details