महाराष्ट्र

maharashtra

अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य असलेल्या माय मराठीची गोडी लाजवाबचं - महेश भागवत

By

Published : Feb 27, 2021, 1:04 PM IST

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी खऱ्या अर्थाने समाज क्रांती घडवून आणली, 'असाध्य ते साध्य करण्या सायास, कारण अभ्यास तुका म्हणे' असे म्हणणारे तुकाराम महाराज 400 वर्षानंतरही मराठी मनावर गारुड करून आहेत. हा दाखला देखील महेश भागवत यांनी मराठीच्या थोरवीबद्दल व्यक्त करताना दिला आहे.

ips mahesh bhagwa
महेश भागवत

हैदराबाद - आज मराठी राजभाषा दिन आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ख्रिस्तपुराणाकार फादर थॉमस स्टीफन यांच्यापर्यंत अनेकांनी माय मराठीची थोरवी कथीत केली आहे. आज घडीला मराठी भाषिक जगभरात आपला झेंडा फडकवत आहेत. मात्र, त्यांची मातृभाषेशी जोडलेली नाळ कायम ठेवली आहे. त्याच प्रमाणे हैदराबादस्थित तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मराठमोळे पोलीस अधिकारी महेश भागवत यांनी देखील संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे अमृतासी पैजा जिंकणाऱ्या या माय मराठीची गोडी खरोखरच लाजबाब असल्याची भावना व्यक्त केली आहे.

मराठी भाषाभिमान-

मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने भागवत यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे की, स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये हिंदीमध्ये भाषण करत असताना, त्यांना एकाने विचारले होते की आपण आपल्या मातृभाषेतच का बोलता? त्यावेळी विवेकानंदांनी त्याचे उत्तर दिले की, तुमची मातृभाषा म्हणजे तुमची आई, आणि तुम्ही तुमच्या आईला जर किंमत देत नसाल तर दुसऱ्याच्या आईचा काय सन्मान कराल?' त्यामुळे मातृभाषेविषयी गर्व असणे म्हणजे दुसऱ्या भाषेला कमी लेखणे असे होत नाही, हे उदाहरण देत भागवत यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला आहे.

750 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असलेल्या या मायमराठीने आपल्याला बहुमोल ठेवा दिला आहे. संत ज्ञानेश्वरांनी देवाची भाषा असलेल्या संस्कृतमधील गीतेचा अर्थ मराठीत निरुपण केला. पसायदानातून ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी केलेले निस्वार्थ मागणे म्हणजे प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना असल्याचेही मत भागवत यांनी व्यक्त केले आहे.

तसेच भागवत धर्माचे कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी खऱ्या अर्थाने समाज क्रांती घडवून आणली, 'असाध्य ते साध्य करण्या सायास, कारण अभ्यास तुका म्हणे' असे म्हणणारे तुकाराम महाराज 400 वर्षानंतरही मराठी मनावर गारुड करून आहेत. हा दाखला देखील महेश भागवत यांनी मराठीच्या थोरवीबद्दल व्यक्त करताना दिला आहे.

मराठी साहित्याचे योगदान-

बाबा पद्मनजी यांची मराठीतील पहिली कांदबरी यमुना पर्यटन यासारख्या साहित्य कलाकृतींतून समाजातील अनिष्ठ रुढी पंरपरावर हल्ला चढवला. तर लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी सांगून गेले भिमराव म्हणत मराठी साहित्यातून दलितांच्या दु:खाला वाचा फोडली, त्या समाजात बदल घडवून आणण्याचे काम केले असल्याचे दाखले देत महेश भागवत यांनी मराठी साहित्याने आणि मराठी भाषेने समाजाला दिलेल्या योगदानाकडेही लक्ष वेधले आहे.

स्त्री शिक्षणासाठी घरदार सोडणाऱ्या सावित्रीबाई फुले, झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लिखाण करणार घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या कुसमाग्रजांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने आपण जागतिक मराठी भाषा दिन साजरा करतो यांच्यासह अनेक मराठी सारस्वतांचा मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाचा महेश भागवत यांनी गौरव केला आहे.

मराठी पाऊल असेच पुढे पडत राहो आणि मराठी भाषेच्या सारस्वतांची सेवा करण्याचे भाग्य आम्हा आणि आमच्या भावी पिढीला प्राप्त अशा सदिच्छा महेश भागवत यांनी आपल्या विचारातून दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details