नवी दिल्ली : आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' भारतीय नौदलाला सुपूर्द केली. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.
जाणून घेऊया त्याची खासियत -INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर हे समुद्राच्या वर तरंगणारे हवाई दलाचे स्थानक आहे. यावरुन आपण लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोनद्वारे शत्रूंचे नापाक इरादे नष्ट करु शकतो. आयएनएस विक्रांतमधून 32 बराक-8 क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. 44,570 टन पेक्षा जास्त वजनाची, ही युद्धनौका 30 लढाऊ विमाने सामावून घेण्यास सक्षम आहे. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि मार्गदर्शित बॉम्ब आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी ती सुसज्ज आहे. मिग-29 साठी लूना लँडिंग सिस्टीम आणि सी हॅरियरसाठी DAPS लँडिंग सिस्टीम यांसारख्या विविध विमानांना हाताळण्यासाठी आधुनिक प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती प्रणाली देखील यावर सुसज्ज आहे.
INS विक्रांतवर 30 विमाने तैनात - INS विक्रांतमध्ये 30 विमाने असतील. ज्यात 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या, मिग-२९ के ('ब्लॅक पँथर') लढाऊ विमाने विक्रांतवर तैनात केली जातील आणि त्यानंतर DRDO आणि HAL द्वारे विकसित केले जाणारे TEDBF म्हणजेच दोन इंजिन डेक बेस्ड फायटर जेट असेल. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. यादरम्यान अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकतात. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-२९ के लढाऊ विमाने तैनात करण्यात येणार आहेत.
बांधण्यासाठी किती खर्च आला -20 हजार कोटी रुपये खर्चून जहाज बांधण्यात आले आहे. हे भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केले आहे आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीने तयार केले आहे. विक्रांत हे अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्यांसह बांधले गेले आहे आणि ते भारताच्या सागरी इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.