महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 15, 2020, 8:54 PM IST

ETV Bharat / bharat

दिल्ली-नोयडा सीमा बंद करण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा इशारा

राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. दरम्यान, आज शेतकरी नेत्यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेतली.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. दरम्यान, आज शेतकरी नेत्यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेतली. कोणत्याही परिस्थिती विजय मिळवणार असल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच उद्या दिल्ली-नोयडा सीमा पूर्णत: बंद करण्याचा इशार शेतकऱ्यांनी दिला आहे.

विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत -

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील कच्छ येथील कार्यक्रमात शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करत असल्याचे मोदी म्हणाले. कृषी क्षेत्रातील या सुधारणा सत्तेत असताना त्या पक्षांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना हे जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले. कच्छमधील शेतकऱ्यांच्या पंतप्रधानांनी समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्याशी चर्चा केली.

सिंघू सीमेवरील आंदोलनाचा २० वा दिवस -

मागील २० दिवसांपासून दिल्लीच्या सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. मात्र, सरकारने कायद्यात दुरुस्त्या सुचविल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना मान्य नाहीत. आधी कायदे रद्द करा, त्यानंतरच शेतकरी सरकार सोबत चर्चा करतील, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. सरकार आंदोलकांबरोबर चर्चा सुरू ठेवेल मात्र, कायदे मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

दिवसेंदिवस दिल्ली सीमेवर आंदोलन शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब आणि हरयाणा सरकारपुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी सीमेवरील टोलनाकेही बंद करण्याचा प्रयत्न केला. वाढत्या गर्दीमुळे दिल्ली सीमेवरील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमेवर सुमारे ६० हजार शेतकरी असल्याचे हरयाणा पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, ही संख्या जास्त असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. हरयाणा, पंजाबसोबतच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि देशभरातील शेतकरी दिल्लीकडे जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details