नवी दिल्ली - कोरोना लसीकरणाचा आज पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला आहे. संपूर्ण भारतभर लसीकरण करण्यासाठी 16,755 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून एकूण 1,65,714 आरोग्य कर्मचारी व इतर संबंधितांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाची लसीकरण मोहीम यशस्वी झाली. लसीकरणानंतर कोणालाही त्रास झाला नाही, कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अद्याप नोंद नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
लसीकरणाचा पहिला दिवस असल्याने काही ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यास उशीर झाला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांना पुरविली गेली. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पुरवठा 12 राज्यांमध्ये करण्यात आला. दोन्ही लसींची देशभरात एकूण 3351 सत्रे घेण्यात आली, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोविड विरूद्ध विजयाच्या दिशेने
आम्हाला एका वर्षामध्ये कोरोना विरुद्धच्या लढ्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश मिळाले. मागील महिन्यांमधील माहिती आणि मृत्यूचे प्रमाण यातून हेच सूचित होत आहे की, आम्ही हळूहळू कोविड विरूद्ध विजयाच्या दिशेने जात आहोत. यापुढे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या व्हिडिओ चर्चेवेळी सांगितले.
मला विचारले गेले की मी लस का घेत नाही?
मागील एक वर्षात कदाचित आपल्या सर्वांसाठी आज मोठा आराम घेण्याचा दिवस आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी या दोन लसी 'संजीवनी'सारख्या देशासमोर आल्या. काहीजण समाजातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी लस, त्यांची उपयोगिता, त्यांची सुरक्षा याबद्दल अफवा पसरवित आहेत. आरोग्यमंत्री किंवा लोकप्रतिनिधी लस का घेत नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे. मला विचारले गेले की मी लस का घेत नाही? मी त्यांना सांगितले की, लस घेण्याची माझी अजून वेळ आलेली नाही. मी वाट पाहतोय जेव्हा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल, तेव्हा मला ती घेता येईल, असे हर्षवर्धन म्हणाले.