महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगी सरकारने अखिलेश यादव यांना विद्यापीठात येण्याची परवानगी नाकारली

अखिलेश यांना विद्यापीठाने पाठवलेले पत्रही समोर आले आहे. 'मागील काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता, कोणत्याही राजकीय नेत्याला विद्यापीठाच्या समारंभांमध्ये सहभागी होऊ दिले जाणार नाही,' असे या पत्रात म्हटले आहे.

By

Published : Feb 12, 2019, 7:57 PM IST

अखिलेश यादव

लखनौ - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी नेत्याच्या शपथविधी कार्यक्रमासाठी जाण्यापासून अडवण्यात आले. अखिलेश यांना विद्यापीठाने आधीच पत्र पाठवून 'विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांना येण्याची परवानगी नसल्याचे' कळविले होते. त्यांच्या सचिवाला हे पत्र पाठविले होते. तरीही त्यांनी येण्याच्या प्रयत्न केल्यामुळे त्यांना अडवण्यात आले, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे. अखिलेश यांना लखनौ विमानतळावरच अडवण्यात आले.

अखिलेश यांनी या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्या राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. अखिलेश यांना विद्यापीठाने पाठवलेले पत्रही यानिमित्ताने समोर आले आहे. 'मागील काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता, कोणत्याही राजकीय नेत्याला विद्यापीठाच्या समारंभांमध्ये सहभागी होऊ दिले जाणार नाही,' असे पत्र विद्यापीठाने पाठवले आहे. आज अखिलेश यांना लखनौ विमानतळावर विमानात चढण्यापासूनच मज्जाव करण्यात आला. तसेच, त्यांना ताब्यात घेण्यात आले.

'भाजप सरकार विद्यार्थी नेत्याच्या शपथविधीलाही घाबरले आहे. त्यांचा अन्यायी कारभार देशातील तरुण सहन करणार नाहीत, याची त्यांना जाणीव झाली आहे,' असे अखिलेश यांनी म्हटले आहे. मात्र, योगी सरकारने त्यांचा दावा फेटाळत त्यांना येऊन देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

'अलाहाबाद विद्यापीठ प्रशासनाने सरकारला अखिलेश यांना प्रयागराजमध्ये येऊ न देण्याची मागणी केली होती. त्यांनी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये परस्पर विरोधी प्रदर्शने होऊन हिंसक वळण लागण्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे अखिलेश यांना प्रयागराज येथे जाण्यापासून अडविण्यात आले,' असे मुख्यमंत्री योगींनी म्हटले आहे. 'समाजवादी पक्ष दंगा-धोपा घडवून आणण्यासाठीच प्रसिद्ध आहे. सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळाही सुरू आहे. तेथे अडचणी निर्माण होणे शक्य होते,' असेही ते म्हणाले.

या घटनेनंतर भाजप केंद्र आणि राज्य सरकार बसप-सप आघाडीमुळे घाबरले आहे का, असा प्रश्न बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. 'आता आम्ही आमच्या पक्षाचे राजकीय कार्यक्रमही घ्यायचे नाहीत का? ही घटनादुर्दैवी असून अशा लोकशाहीविरोधी कृतींना विरोध करणे आवश्यक आहे. अखिलेश यांना विमानतळावरच अडवणे ही हुकुमशाही असून लोकशाहीची हत्या केल्याचे प्रतीक आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अखिलेश यांना विमानतळावर अडवण्यात आल्याचा निषेध केला आहे. 'भाजपद्वारे विरोधी पक्षनेत्यांना नेस्तनाबून करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे,' असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details