नवी दिल्ली - भाजपचे दिल्लीतील मॉडल टाउन येथील उमेदवार कपिल मिश्रा यांच्या टि्वटवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. कपिल मिश्रा यांना शाहीन बागवर केलेले टि्वट चांगलेच महागात पडले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना प्रचार करण्यास ४८ तास बंदी घातली आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी कपिल यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने टि्वटरलाही संबधित टि्वट हटवण्यास सांगितले होते. त्यानुसार टि्वटरने संबधित हटवले आहे. दिल्लीतील रस्त्यांवरील बस जरी कोणी पेटवून दिल्या तरी मी काहीच बोलणार नसून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणार आहे. माझा संदेश जनतेपर्यंत पोहचला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.'8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्तानमध्ये सामना होणार आहे', असे टि्वट केले होते. संबधित टि्वटमुळे निवडणूक आयोगाने शुक्रवारी कपिल यांना नोटीस पाठवली होती. त्यावर 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे', असे कपिल मिश्रा म्हणाले होते.