लखनऊ - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उपटत आहेत. देशभरातून उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका झाल्यानंतर हाथरस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना केली आहे. एसआयटीने आज पुन्हापीडित कुटुंबाचा जबाब नोंदवून घेतला. तथापि, एसआयटीने दोन दिवसांपूर्वी पीडित कुटुंबीयांचे जबाब घेतले होते. याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सीबीआयचे आदेश दिले आहे.
हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यासह संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. यावर योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
तथापि, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी हाथरसमधील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सुमारे एक तास दोघांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली. दोघांनी पीडित कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना दोघांनी व्यक्त केली. 'जिथे अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहू, कोणीही आम्हाला अडवू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. जगातील कोणतीही शक्ती कुटुंबीयांचा आवाज दाबू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. हाथरसप्रकरणी सर्व विरोधी पक्ष आक्रमक झाले असून पीडित तरुणींना न्याय देण्याची मागणी होत आहे.