महाराष्ट्र

maharashtra

'एक राष्ट्र एक निवडणूक' मुद्द्यावर राष्ट्रीय चर्चा व्हावी, शरद पवारांचे संसदीय कामकाजमंत्र्यांना पत्र

By

Published : Jun 20, 2019, 9:54 AM IST

देशात अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असल्याने त्यांच्या भूमिका वेळोवेळी बदलू शकतात. त्यांमुळे संयुक्त आघाड्यांची सरकारे 'एक राष्ट्र एक निवडणूक' प्रक्रियेत अडथळा आणू शकतात, असे पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहले. एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

एक राष्ट्र एक निवडणूक ही कल्पना चांगली आहे. मात्र, ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी अनेक राजकीय अडथळे येऊ शकतात. भारतात मोठ्या प्रमाणात राजकीय विविधता आहे. १९५७ नंतर लोकसभा आणि विधानसभा या त्यांच्या कार्यकाळापूर्वीच अनेकदा विसर्जीत करण्यात आल्या आहे. देशात अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असल्याने त्यांच्या भूमिका वेळोवेळी बदलू शकतात. त्यांमुळे संयुक्त अघाड्यांची सरकारे 'एक राष्ट्र एक निवडणूक' प्रक्रियेत अडथळा आणू शकतात, असे पवार यांनी म्हटले आहे.

एक राष्ट्र एक निवडणूक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय चर्चा घडवून आणण्याची आमच्या पक्षाची मागणी असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी एक राष्ट्र एक निवडणूक या मुद्द्यावर महत्वाची भूमिका घेत या चर्चेत सहभागी होणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्यांनीही हा मुद्दा गांभीर्याने विचारात घ्यावा. विरोधकांनाही या प्रक्रियेत विचारात घेऊन या मुद्द्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

या पत्रात पवार यांनी खेड्यांच्या विकासाचाही मुद्दा मांडला. देशातील प्रत्येक राज्यातील आणि केंद्र शासित प्रदेशातील ७५ हालाखीची परिस्थिती असलेल्या खेड्यांचा विकास करून देशासमोर एक विकासाचे मॉडेल उभे करावे. त्या ७५ खेड्यांना पक्क्या रस्त्यांनी त्या त्या राज्यांच्या राजधानीशी जोडावे. जेणेकरून त्या गावांच्या विकासाचे मॉडेल समोर ठेवून देशातील इतर खेड्यांचा विकास करता येईल.

विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था सुरू करव्यात. त्यामुळे देशाच्या प्रगतीसह त्यांचाही विकास होईल. या जिल्ह्यांमध्ये शेतीकडे विशेष लक्ष पुरवले जाईल, अशा योजणा आखण्याची गरज असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details