नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायेझेशनच्या बैठकीसाठी तीन दिवस रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. हा दौरा पूर्ण झाला असून मायदेशी परतताना राजनाथ सिंह इराणला भेट देणार आहेत. मास्कोवरुन तेहरानला निघालो आहे. इराणचे संरक्षणमंत्री ब्रिगेडीयर जनरल अमिर हतामी यांची भेट घेणार असल्याचे ट्विट सिंह यांनी केले आहे.
रशियामध्ये एसीओच्या संरक्षणमंत्री स्तरावरील बैठकीला सिंह यांनी हजेरी लावली. त्यासोबतच कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन (CSTO) आणि कॉमनवेल्थ इंडिपेन्डन्स स्टेट्स या बैठकीतही सहभाग घेतला. राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांसोबतही बैठक घेतली. भारत - चीन सीमेवर तणाव वाढला असताना दोन्ही नेत्यामंध्ये बैठक झाली. भारताने सीमेवरील तणाव कमी करण्याची गरज व्यक्त केली. सुमारे अडीच तास ही बैठक चालली.
चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य आणि लष्करी सामग्री जमा केली आहे. एकतर्फीपणे आक्रमक भूमिका घेत सीमा बदलण्याचा प्रयत्न भारत-चीनमधील करारांच्या विरोधात असल्याचे भारताने बैठकीत सांगितले. मात्र, सीमेवरील वादास संपूर्णपणे भारत जबाबदार असल्याचे वक्तव्य चीनने केले. जुलैच्या मध्यापासून लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील बैठकांत जास्त प्रगती झाली नसून चर्चा रेंगाळली आहे.
29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याने सीमेवरील 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. भारताने पँगाँग क्षेत्रातील मोक्याच्या ठिकाणांवर सैन्याची तैनाती केली आहे. चीनने घुसखोरी करण्याआधीच भारतीय सैन्य पहाडी भागात पोहचले असून या ठिकाणांवरून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सुमारे ३० मोक्याच्या ठिकाणी भारताने सैन्य तैनात केले असून चीनला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे भारताला पुढील सीमा चर्चेतही फायदा होणार आहे.
चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे. दरम्यान, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लष्करीस्तरावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. जुलैच्या मध्यावधीपासून सीमावादावरील चर्चा रेंगाळली आहे.