नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये जोरदार राजकीय नाट्य सुरू आहे. काँग्रेस-जेडीएसचे नेते भाजपकडून कर्नाटकातील आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत आहेत. या उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'राहुल गांधींनीच राजीनामा ट्रेण्ड आणला' असा टोला लगावला आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा काही संबंध नाही, असे त्यांनी लोकसभेत सांगितले.
राहुल गांधींनीच 'राजीनामा ट्रेण्ड' आणला, राजनाथ सिंहांचा टोला
'राजीनामा देण्याची परंपरा राहुल गांधींनी सुरू केली आहे. तेव्हा पक्षातील इतर लोक त्यांचेच अनुकरण करत आहेत. काँग्रेसमधील कोणी राजीनामा देत असेल तर त्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे,' असे सिंह म्हणाले.
'आमच्या पक्षाने कधीच घोडेबाजार केलेला नाही. आम्ही संसदीय लोकशाहीची पवित्रता कायम राखण्यासाठी कटीबद्ध आहोत. आमच्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. राजीनामा देण्याची परंपरा तर राहुल गांधींनी सुरू केली आहे. तेव्हा पक्षातील इतर लोक त्यांचेच अनुकरण करत आहेत. काँग्रेसमधील कोणी राजीनामा देत असेल तर त्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. त्यांनी स्वतःच कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यास सांगितले, एवढेच नाहीतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील राजीनामे देत आहेत,' असे सिंह यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला होता. कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आज काँग्रेसच्या तब्बल २२ मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.