नवी दिल्ली - कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारित अॅप विकसित केले आहे. सध्या केंद्र सरकार सगळ्यांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचे आवाहन करत आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोग्य सेतू अॅपवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या अॅपमुळे लोकांची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता राहुल गांधींनी वर्तवली आहे.
आरोग्य सेतू अॅपवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आरोग्य सेतू हे अॅप लोकांच्या आयुष्यावर देखरेख करणारी एक प्रणाली आहे. ते एका खासगी ऑपरेटरकडून आउटसोर्स केले जात असून त्यावर सरकारी संस्थेचं नियत्रंण नाही. लोकांचे खासगी आयुष्य, डेटा आणि गोपीनियतेच्या सुरक्षेसंदर्भात हे अॅप प्रश्न उपस्थित करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्याला सुरक्षित ठेवण्यात मदत करत आहे. मात्र, नागरिकांच्या सहमतीशिवाय कोरोना संकटाचा फायदा उचलत त्यांच्यावर निगरानी ठेवणं चुकीचं आहे', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.