नवी दिल्ली -भारत-चीन सीमेवरील तणाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आता दुसऱ्यांदा चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 'चीनबरोबर चर्चेच्या प्रक्रियेवर आणि प्रगतीवर जनता लक्ष ठेवून असल्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले'.
'सीमेवरील तणाव कमी होत असल्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, तणाव कमी करण्यासाठी जी चर्चा होत आहे, त्या प्रक्रियेकडे आणि प्रगतीकडे जनता लक्ष ठेऊन आहे. 5 मे 2020 ला सीमेवर जी स्थिती होती, ती पुन्हा झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा', असे ट्विट पी. चिदंबरम यांनी केले आहे. चीनबरोबर सीमावाद सुरू झाल्यापासून काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर सतत टीका केली आहे. केंद्र सरकार गलवान व्हॅलीवर भारताचा दावा कमकूवत करत असल्याचा आरोप काल(गुरुवार) काँग्रेसने केला. तसेच 'बफर झोन' भारतीय भूभागात केला जातोय का? याचे उत्तर सरकारकडे मागितले.