नवी दिल्ली - भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर शुक्रवारी कट्टरतावाद्यांनी दगडफेक केली. 'या घटनेवर अद्याप नवज्योत यांनी प्रतिक्रिया दिली नसून ते कुठे पळून गेले आहेत', असा टोला मिनाक्षी लेखी यांनी लगावला.
काँग्रेसने ननकाना साहेब गुरुद्वारा हल्ल्यावर काही प्रतिक्रिया दिल्याचे मी ऐकले नाही. या घटनेवर अद्याप नवज्योत यांनी देखील प्रतिक्रिया दिली नसून ते कुठे पळून गेले आहेत? गुरुद्वारावर हल्ला झाल्यानंतरही सिद्धू यांना जर आयएसआय प्रमुखांना मिठी मारण्याची इच्छा असेल, तर काँग्रेसने या प्रकरणात विशेष लक्ष घातले पाहिजे, अशी टीका भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी केली. ननकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सिद्धू यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनीदेखील सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सिद्धू यांच्या दरम्यान चांगले संबंध आहेत. त्यामुळे सिद्धू यांच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा लोकांना होती. पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर तेथील काही कट्टरतावाद्यांनी हिंसक आंदोलन केले. या हल्ल्यावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही पत्रक जारी केले असून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तोडफोड करणाऱ्यावर पाकिस्तान सरकारने कारवाई करावी. तसेच ननकाना साहेब गुरुद्वाराच्या सुरक्षितेसंबधी उपाययोजना करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.