रांची - मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर; आता झारखंड मध्येही काँग्रेस आपले आमदार गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते, आणि झारखंडमधील मंत्री रामेश्वर ओराव यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की भाजप (भारतीय जनता पक्ष) हे काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने मात्र हे आरोप फेटाळले असून, मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस ही खेळी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकांमध्ये आमच्या बऱ्याच आमदारांशी भाजपने संपर्क साधला होता. या आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले होते. अजूनही भाजप यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, आमचे आमदार हे पक्षनिष्ठ असून, भाजपच्या प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, असे ओराव यांनी स्पष्ट केले. भाजप प्रवक्ते प्रतुल सहदेव यांनी मात्र काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. सोरेन यांच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या मताला कोणतीही किंमत नाही. त्यामुळे सोरेन यांच्यावर दबाव आणण्यासाठी काँग्रेस ही खेळी करत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस सध्या सत्ताधारी पक्षात आहे. जर अशा प्रकारचे काही प्रयत्न आमच्याकडून होत असतील, तर त्यांनी तक्रार दाखल करून याबाबत चौकशी करून घ्यावी, असेही ते म्हणाले. सहदेव पुढे म्हणाले, की झारखंडमधील कोरोनास्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत आहे. लोकांचे लक्ष यावरून दुसरीकडे वळवण्यासाठी काँग्रेस असे मुद्दे वर काढत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष सोरेन यांच्या कामावर नाखूष आहे. सरकारच्या बऱ्याच निर्णयांविरोधात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.