नवी दिल्ली / इस्लामाबाद -भारताने कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. यामागील 'आरएसएसच्या हिंदू विचारसरणीची आपल्याला भीती वाटू लागली आहे. भारताचा कलम 370 रद्द करण्याचा निर्णय म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे', असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
'नाझी विचारसरणीप्रमाणेच संघाची विचारसरणी आहे. त्यामुळेच आज काश्मीरमध्ये संचारबंदी करण्यात आली. त्यांच्या या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल. संघाची विचारसरणी ही हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे', असे इम्रान खान यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
इम्रान खान यांच्या टि्वटवर भाजप सरचिटणीस राम माधव यांनी हल्लाबोल केला आहे. 'जगात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान किती कावराबावरा झाला आहे. जगाला भारतापासून नाही तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा धोका आहे. मोहम्मद अली जिना यांच्या दोन राष्ट्राचा आणि शेख अब्दुल्ला यांच्या तीन राष्ट्राचा सिद्धांत आम्ही संपवला आहे. तुम्ही पाकिस्तानमधील धार्मिकतावाद संपवाल का?', असा प्रश्न राम माधव यांनी टि्वट करून विचारला आहे.
भारत सरकारने कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानचे भारतीय राजदूताला भारतात परतण्याचे निर्देश दिले. भारताबरोबर व्यापार, राजनैतिक संबंध तोडण्यापर्यंतची आक्रमक भूमिका घेऊनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही.