नवी दिल्ली - दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा सुगावा लागल्याने चार काश्मिरी तरुणांना स्पेशल सेलने अटक केली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि 120 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्यांपैकी इश्फाक माजिद कोका हा काश्मीरचा कुख्यात दहशतवादी बुरहान कोका उर्फ छोटा बुरहानचा मोठा भाऊ आहे. भारतीय सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला होता.
'दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन निरीक्षक सुनील, रवींद्र जोशी आणि विनय यांचे पथक अतिरिक्त पोलीस आयुक्त हृदय भूषण आणि ललित मोहन नेगी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. यावेळी त्यांना काही संशयित काश्मिरी दिल्लीत लपल्याची माहिती मिळाली,' अशी माहिती स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी दिली. हा गट राजधानी दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा कट रचत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे असल्याची माहिती स्पेशल सेलच्या पथकाला मिळाली होती.
हेही वाचा -शिया मौलवींचे नवी दिल्लीत पाकिस्तानविरोधात आंदोलन
29 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत अन्सार गाजवत-उल-हिंद प्रमुख, बुरहान कोका यांना लष्कराने ठार मारले होते. त्यानंतर त्याचा भाऊ इश्फाक माजिद कोका दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. नुकतीच, स्पेशल सेलला काश्मिरी तरुणांनी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे गोळा केल्याची माहिती मिळली होती. त्यांना प्राप्तिकर कार्यालय (आयटीओ) आणि दर्यागंजच्या परिसरात पाहण्यात आले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना सापळा लावून पकडले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाला घेरत त्यांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत इश्फाक माजिद कोका अन्सार गझवत-उल-हिंदच्या प्रमुखांशी संपर्क साधत असल्याचे स्पेशल सेलला समजले आहे. त्याने त्याच्या दुकानात काम करणाऱ्या अल्ताफ अहमद डारला दिल्लीतील हल्ल्यासाठी तयार केले, अशी माहिती समोर आली आहे.
याव्यतिरिक्त, इश्फाक याने संगणक विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला आपला नातेवाईक आकीब सैफी यालाही आपल्या कटात सामील करून घेतले होते. अल्ताफ अहमदने श्रीनगरमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या मुश्ताक अहमद गनी यालाही या कटात भाग घेण्यासाठी सोबत आणले होते.
माजीद आपल्या 'किंगपीन'च्या सांगण्यावरून 27 सप्टेंबर रोजी दिल्लीला आला आणि पहाडगंजमध्ये राहिला. शस्त्रे खरेदी करण्यासाठी त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले. शस्त्रे खरेदी केल्यानंतर तो दहशतवादी हल्ला करण्याची संधी शोधत होता.
हेही वाचा -भारतीय सैन्याने केली गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मारकाची निर्मिती