नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी एका वर्षात १०० दिवस मिळावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बीएसएफच्या जवानांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले. ते दिल्लीत 'बीएसएफ'च्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जवानांनी संचलन करत शक्तीप्रदर्शन केले.
हेही वाचा -देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
जवानांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यास सरकार कटीबद्ध आहे. बीएसएफ जवानांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. तसेच ज्या जवानांची नेमणूक काश्मीरमध्ये झाली आहे, अशा जवानांना जम्मू ते दिल्लीपर्यंतचा विमान प्रवास मोफत देण्यात आला आहे, असे राय म्हणाले.
ज्या सैनिकांना उत्कृष्ट सेवा मेडल मिळाले आहे किंवा वीरमरण आले आहे, अशा सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्लीमध्ये वाजवी दरात १ बीएचके फ्लॅट देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निमलष्करी दल वेतन योजनेनुसार जवानांचा अपघाती विमा ३० लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचे राय यांनी सांगितले.
हेही वाचा -धोकादायक दहशतवाद जागतिक शांततेसमोर नवीन आव्हान..
सीमेवरून घुसखोरी करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतात. ड्रोनद्वारे होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही पावले उचलली असल्याचे बीएसएफचे संचालक विवेक कुमार जोहरी यांनी सांगितले.