नवी दिल्ली - देशभरातील 9.2 लाखांहून अधिक मुले 'गंभीर स्वरूपातील कुपोषित' आहेत. तर सर्वांत जास्त प्रमाण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आहे. कोरोनाच्या या संकटात ही संख्या आणखी वाढू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशात सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील 9,27,606 'गंभीर कुपोषित' मुले आढळली आहेत. सर्वाधिक 3,98,359 मुले उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये 2,79,427 मुले आढळली आहेत. लडाख, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर आणि मध्य प्रदेशात एकही गंभीर स्वरुपातील कुपोषित बालक आढळले नाही.
गंभीर कुपोषण झालेल्या मुलांची उंची आणि वजन कमी असते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे कोणत्याही आजारामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नऊपट जास्त असते. महिला व बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कुपोषित बालकांची नोंदणी करण्यास सांगितले होते. जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करता येईल. त्यानंतर 9,27,606 हा आकडा समोर आला आहे. जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ही संख्या आणखी वाढू शकते.