वाशिम- सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. वेगवेगवेगळ्या मतदार संघातून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टीकांनाही उधाण आले आहे. अशातच वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातील सभेमध्ये बोलताना प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरलीय. त्यांनी पक्षांतर करणाऱ्या राजकीय नेत्यांवर निशाना साधताना जहरी टीका केली आहे.
तिकीट न मिळाल्याने पक्षांतर करणारे हरामखोर या देशात कमी नाहीत - आमदार बच्चू कडू
निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने पक्षांतर करणाऱ्या हरामखोरांची संख्या कमी नाही... आमदार बच्चू कडूंची प्रचारसभेत जीभ घसरली... म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजीनामा देणारा एकही मर्द दिसला नाही
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात बोलताना कडू म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एखादा तरी राजकीय नेता राजीनामा देताना दिसून येतो का? शेतकऱ्यांना न्याय द्यायचा होता. परंतू तो या सरकारने दिला नाही म्हणून मी राजीनामा देत आहे, असे म्हणणारा एकतरी मर्द सापडतोय का, संपूर्ण देशभरात असा एकही व्यक्ती दिसला नाही. मात्र, निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देशात कमी नाही, हे सांगताना त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर जहरी टीका केली.